भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी वोट जिहादचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली होती. आता त्यांच्या त्या दाव्याला पुष्टी देणारे वक्तव्य माजी आमदार आसीफ शेख यांनी केले आहे. त्यामुळे वोट जिहादच्या सोमय्या यांच्या दाव्याला बळ मिळत आहे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांसाठी भरपूर पैसा आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. मालेगावात १२५ कोटी या वोट जिहादसाठी आल्याचा आरोप त्यांनी केला होता.
मालेगावमधील लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा हा बाहेरू आला होता, असा खळबळजनक आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी आता केला आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देणार असल्याचे शेख यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय तपास यंत्रणांसमोर याविषयीचे सर्व पुरावे सादरही करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्याकडे या सर्व आरोपांविषयी भक्कम पुरावे आहेत, असा दावाही शेख यांनी केला आहे.
आसीफ शेख हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. त्यानंंतर त्यांनी गेल्या वर्षी इस्लाम नावाचा पक्ष स्थापन केला होता.
दरम्यान, एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान वोट जिहादबाबत सुतोवाच केले होते, असा दावा शेख यांचा आहे. मालेगावात वोट जिहाद झाला होता पण आपल्याला असा कोणताही पैसा मिळाला नाही, असे इस्माईल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितल्याचे शेख यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
देशभरात होळीचा उत्साह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा!
पंजाब: शिवसेना जिल्हाध्यक्षाची गोळीबारात हत्या, एक अल्पवयीन मुलगाही जखमी!
काँग्रेसी ताजे टूलकीट जोडते ‘वक्फ’च्या मनमानीचा विकसित भारताशी संबंध..
विजापूरमध्ये १७ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, ९ जणांवर २४ लाख रुपयांचे बक्षीस!
माजी आमदार आसिफ शेख यांनी टाकलेल्या या नव्या बॉम्बमुळे मालेगावमधील निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन(AIMIM) या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयावरच प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे. शेख म्हणतात की, मालेगावात बाहेरून पैसा आला होता. मला पराभूत करण्यासाठी या पैशाचा उपयोग झाला. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मी तपास यंत्रणांकडे ते पुरावे द्यायला तयार आहे.
सरकारने या सर्व प्रकरणात विविध तपास यंत्रणांकडून चौकशी करावी अशी मागणीही शेख यांनी केली आहे. ईडी, एटीएस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करावी अशी त्यांची मागणी आहे. एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी शेख यांना आव्हान देत त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत असेही म्हटले आहे.
१२५ कोटी कुठून आले होते?
विधानसभा निवडणुकीदरम्यान मालेगाव मर्चंट बँकेच्या खात्यांत १२५ कोटी रुपये आल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून खळबळ उडाली होती. त्याविषयी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुद्धा आवाज उठवला होता. हा इतका पैसा कुठून आणि कसा आला असा सवाल त्यांनी केला होता. तर वोट जिहादसाठी हा पैसा वापरण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता.