गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरे काय म्हणाले?

सोशल मीडियावर खास संदेश पोस्ट

गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरे काय म्हणाले?

गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी देशभरातील नेत्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही सोशल मीडियावर महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त खास संदेश पोस्ट केला आहे.

“आज महात्मा गांधीजींची जयंती. व्यक्तिगत ते सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेसाठीचा आग्रह, स्वच्छ, निर्मळ मन आणि अर्थात स्वच्छ हेतू याच्या सहाय्याने त्यांनी हिंदुस्थानाला स्वातंत्र्याची दिशा नाही दाखवली तर जगाला अनेक शतकं प्रेरणा दिली. जगातील लोकप्रिय नेते गांधीजी होते का किंवा आहेत का? असतीलही किंवा नसतीलही. पण आज देखील त्यांचं अनुकरण करावं असं जगातील लाखो करोडो लोकांना वाटतं, इतकं संचित मागे ठेवून गेलेल्या या महापुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन”, असं राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा:

जमिनीच्या वादातून एकमेकांवर गोळीबार, ६ ठार!

एलॉन मस्क यांनी ट्रुडो यांच्याविरोधात थोपटले दंड!

ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!

अविनाश साबळेची सोनेरी धाव!

तसेच मनसे रिपोर्टने राज ठाकरेंच्या भूमिकेसंदर्भातली एक पोस्ट शेअर केली आहे. यात राज ठाकरेंनी सविस्तर भूमिका मांडली आहे. “महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधीजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की फक्त भारतातच नव्हे, तर जवळपास तीन खंडांतील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं, ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही. विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले. कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षांतच मागे पडलेले दिसले. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले. पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. याला कारण चर्चिल यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं. ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं. शृंखला, मग त्या अज्ञानाच्या असोत की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कुणालाच नाही. कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे. म्हणूनच गांधीजींसारखं बहुदा दुसरं कुणी होणे नाही, असं विस्तृत मत या पोस्टमध्ये शेअर करण्यात आलं आहे.

Exit mobile version