मुंबईत विकासकामांना गती; पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेले प्रकल्प कोणते? काय होणार फायदा

२९ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी

मुंबईत विकासकामांना गती; पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेले प्रकल्प कोणते? काय होणार फायदा

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. याचं पार्श्वभूमीवर राज्यात सध्या विकासकामांना गती आलेली आहे. शनिवार, १३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईचा दौरा करत मुंबईतील गोरेगाव स्थित नेस्को प्रदर्शन केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री यांनी २९ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. हे सर्व प्रकल्प मुंबई आणि उपनगरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने हे प्रकल्प जनतेच्या हिताचे आहेत.

ठाणे- बोरिवली हा तब्बल १६,००० कोटी रुपये खर्चाचा बोगदा प्रकल्प आहे. ठाणे आणि बोरिवली या दोन शहरांना जोडणारा हा दुहेरी ट्यूब बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. यामुळे बोरिवलीच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ठाणे कडील ठाणे घोडबंदर रोड दरम्यान थेट संपर्क व्यवस्था निर्माण होईल. तसेच या दोन्ही रस्त्यांवरील ताण कमी होणार आहे. प्रकल्पाची एकूण लांबी ११.८ किमी आहे. यामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास १२ किमीने कमी होईल आणि प्रवासाच्या वेळेत सुमारे एक तासाची बचत होईल. सध्या हा टप्पा गाठायला दीड ते दोन तास लागतात मात्र, हा मार्ग तयार होताच हा टप्पा सुमारे २५ मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.

गोरेगाव- मुलुंड लिंक रोड या ६,३०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी केली. गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग ते मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग या दरम्यान रस्ता जोडणे ही गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची कल्पना आहे. यामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. गोरेगाव- मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची एकूण लांबी अंदाजे ६.६५ किलोमीटर आहे आणि पश्चिम उपनगरांना नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे मुंबई एक्स्प्रेस वे शी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे.

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’चा प्रारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. हा एक परिवर्तनकारी आंतरवासिता कार्यक्रम असून १८ ते ३० या वयोगटातील तरुणांना कौशल्य सुधार आणि उद्योगाभिमुखतेच्या संधी देऊन तरुणांमधील बेरोजगारीची समस्या सोडवणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे. यासाठी सुमारे ५,५४० कोटी रुपये खर्च होणार आहे.

कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेच्या कामाची पायाभरणी देखील पंतप्रधानांनी केली. कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरी रेल्वे गाड्या यांच्या वाहतुकीचे पृथक्करण करण्यात मदत होईल. या पुनर्रचनेनंतर अधिक गाड्यांची वाहतूक हाताळण्यासंदर्भात यार्डाच्या क्षमतेत वाढ होईल, रेल्वेगाड्यांची कोंडी होणे कमी होईल आणि गाड्यांचे परिचालन करण्यासंदर्भात यार्डाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल. यासाठी ८१३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

नवी मुंबईमध्ये तुर्भे येथील गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल ३२,६०० चौरस मीटर्सहून अधिक क्षेत्रावर उभारले जाणार असून हे टर्मिनल स्थानिक जनतेसाठी अतिरिक्त रोजगार संधी निर्माण करेल आणि सिमेंट तसेच इतर वस्तूंच्या हाताळणीसाठी आवश्यक अतिरिक्त टर्मिनलची गरज पूर्ण करेल. हा प्रकल्प २७ कोटींचा असेल.

हे ही वाचा:

‘म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात’… !

इम्रान खान यांच्या पक्षावर पाक सरकार घालणार बंदी!

‘कॅम्लिन’ उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन

चीन समर्थक केपी ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी !

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवे फलाट तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधील फलाट क्र. १० आणि ११ चा विस्तारीत भाग यांचे लोकार्पण देखील झाले. लोकमान्य टिळक टर्मिनसमधील नवे, अधिक लांबीचे फलाट जास्त लांबीच्या गाड्यांसाठी सुयोग्य ठरतील आणि प्रत्येक गाडीत अधिक प्रवाशांची सोय होईल. तसेच प्रवाशांच्या वाढलेल्या वाहतुकीचे नियमन करण्याची रेल्वे स्थानकाची क्षमता देखील यामुळे सुधारेल. यासाठी ६४ कोटींचा खर्च आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाट क्र. १० आणि ११ यांची लांबी ३८२ मीटरने वाढवण्यात आली असून या भागावर सावलीसाठी आच्छादन तसेच गाडी धुण्याच्या दृष्टीने या भागातील रेल्वे रुळांवर विशेष सोय देखील केलेली आहे. या विस्तारामुळे या फलाटाची क्षमता तब्बल २४ डब्यांची गाडी उभी राहण्याइतकी वाढली आहे. यासाठी ५२ कोटी रुपये खर्च आला आहे.

Exit mobile version