वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या १६४ हून अधिक; अजूनही बचावकार्य सुरू

विविध बचाव पथकातील २५० कर्मचारी आणि २२५ लष्कराचे जवान बचाव कार्यात सहभागी

वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या १६४ हून अधिक; अजूनही बचावकार्य सुरू

केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाःकार उडवला असून मंगळवार, ३० जुलै रोजी पहाटे वायनाडच्या मेप्पाडी या डोंगराळ भागात भूस्खलन झाल्याची घटना घडली होती. भूस्खलनाची घटना भयंकर असून या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता १६४ च्या पुढे पोहोचली आहे. तर, अजूनही ९० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे.

घटनास्थळी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून सुरू असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. या घटनेत आतापर्यंत १२८ जण जखमी झाल्याची माहिती आहे. शिवाय हवामान विभागाने या परिसरात पुन्हा पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांना गर्दी केली आहे. नातेवाईक आपल्या जीवलगांचा शोध घेत असून प्रियजनांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. ड्रोन आणि श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे. अजूनही बरेच लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेनंतर केरळ सरकारनं दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

वायनाडमध्ये नागरी संरक्षण, पोलीस, अग्निशमन विभाग, एसडीआरएफ, एनडीआरएफचे सुमारे २५० कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. तर, लष्कराच्या १२२ इन्फंट्रीचे सुमारे २२५ जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. वायनाडमधील भूस्खलनानंतर तब्बल ४५ मदत शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये तब्बल तीन हजारांहून अधिक लोकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेवर दगडफेक करणारे महिलांच्या पुढाकाराने जेरबंद

ठाकरेंनी ब्रह्मास्त्रच काढले…

मध्यप्रदेशातील मदरशांवर कारवाई सुरू, श्योपूर जिल्ह्यातील ५६ मदरशांची मान्यता रद्द !

हिंदू कार्यकर्ता अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेवर धर्मांधांची दगडफेक, धारावीत संताप, लोक रस्त्यावर उतरले

केरळमध्ये पावसाने हाहाःकार माजवला असून मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये मंगळवार, ३० जुलै रोजी पहाटे भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी या डोंगराळ भागात भूस्खलन झाले.वायनाडमधील भूस्खलानाच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर (ट्विट) पोस्ट करत म्हटले होते की, “भूस्खलनाच्या घटनेमुळे आपण व्यथित झालो आहोत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्या सर्वांसोबत आम्ही आहेत आणि जखमींबाबतही प्रार्थना करतो. सर्व बाधितांना मदत करण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि तेथील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल.”

Exit mobile version