आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गतविजेता कोलकाता नाइट रायडर्सवर मात करून शानदार विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद अर्धशतक (५९ धावा) झळकावत संघाला विजय मिळवून दिला. त्यांच्या या खेळीचं माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू हेडन यांनी कौतुक करत त्याला “चेजिंग मास्टरक्लास” म्हटले. त्यांनी कोहलीच्या सध्याच्या फॉर्मला “कोहली २.०” असे संबोधले.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने २०२४ मधील आपल्या कामगिरीला पुढे नेत पुन्हा एकदा उत्कृष्ट फलंदाजी केली. फिलिप साल्ट (३१ चेंडूंत ५६ धावा) सोबत जोरदार सलामी भागीदारी केल्यानंतर कोहलीने १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत आरसीबीला ७ विकेट्सनी विजय मिळवून दिला.
सामना संपल्यानंतर मॅथ्यू हेडन यांनी जिओहॉटस्टारवर सांगितले, “हे लक्ष्य विराट कोहलीसाठी अगदी योग्य होतं. अशा खेळपट्टीवर जिथे सामान्य किंवा त्याहून थोडा अधिक स्कोर असतो, तिथे कोहली आणखी उजळून निघतो. फिलिप साल्टने स्ट्राइक रेट वाढवण्यास मदत केली. कोहलीने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध जिथून संपवलं होतं, तिथूनच पुढे सुरुवात केली आहे. मात्र, आज रात्री आणि मागील २ हंगामांमध्ये आपण ‘विराट कोहली २.०’ पाहत आहोत. विशेषतः मिडल ओव्हर्समध्ये कोहली अतिशय आक्रमक होता आणि त्याचा स्ट्राइक रेट १७० पेक्षा अधिक होता, जे या धावसंख्येसाठी महत्त्वाचं होतं.”
भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी आरसीबीचा नवा कर्णधार रजत पाटीदारच्या खेळीचे कौतुक केले. त्याने १६ चेंडूंत ३४ धावांची तुफानी खेळी साकारली. गावस्कर म्हणाले, “पाटीदार कोहलीसोबत बराच काळ खेळला आहे, त्यामुळे तो सहज त्याच्या शैलीत सामावला. फलंदाजीला आल्यानंतर कोहलीने त्याला आत्मविश्वास दिला आणि स्वातंत्र्याने खेळण्याची मुभा दिली. ही एक अप्रतिम खेळी होती.”
ते पुढे म्हणाले, “आरसीबीने केकेआरला २००-२१० च्या संभाव्य धावसंख्येवर जाण्यापासून १७५ धावांवर रोखणे हे संघासाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढेल. कर्णधार आणि फलंदाज म्हणून रजत पाटीदारने उत्तम खेळ दाखवला. गोलंदाजी बदलही त्याने अत्यंत हुशारीने केले.”
हेही वाचा :
लखनऊ सुपर जायंट्सच्या ताफ्यात मोहसिन खानच्या जागी शार्दुल ठाकूरची वर्णी!
सुशांत सिंह राजपूत प्रकरण : सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सार्वजनिक करावा
कर्नाटक विधानसभेत भाजप आमदारांचे ६ महिन्यांसाठी निलंबन योग्य नाही : जगदीश शेट्टार
१० वर्षात भारताचा जीडीपी दुप्पट
आरसीबीच्या विजयात क्रुणाल पांड्याचा मोठा वाटा होता. त्याने ४ षटकांत २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या आणि केकेआरच्या आक्रमक सुरुवातीला ब्रेक लावला. हेडन म्हणाले, “क्रुणाल अत्यंत चतुर खेळाडू आहे. त्याच्या गोलंदाजीतील विविधता आणि दबावाखाली केलेली प्रभावी कामगिरी त्याच्या क्षमतेचं द्योतक आहे. एक क्षण असा होता, जेव्हा आरसीबी अडचणीत वाटत होती, पण त्याने संघाला पुनरागमन करून दिलं.”
हेडन यांनी आरसीबीच्या संपूर्ण संघाचं कौतुक करत सांगितलं, “रजत पाटीदारसाठी हा विजय खूप खास होता. विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म संघासाठी मोठा फायदा आहे. गोलंदाजी मजबूत दिसत आहे. क्रुणाल पांड्याने मिडल ओव्हर्समध्ये अप्रतिम भूमिका बजावली आणि जोश हेजलवूडनेही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. खूप दिवसांनी असं वाटत आहे की आरसीबीचा संघ या वर्षी काहीतरी खास करणार आहे.”