पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता सध्या परिस्थिती शांत आहे. पोलीस, सुरक्षा दल सर्व ठिकाणी नजर ठेवून आहेत. सीआरपीएफच्या अतिरिक्त तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. याच दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगालमध्ये होत असलेल्या दंगलींबाबत मोठे विधान केले आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले, ‘लातों के भूत बातों से नहीं मानते’.
आज (१५ एप्रिल) राज्याच्या हरदोई जिल्ह्यातील अमर सेनानी राजा नरपती सिंह स्मारक स्थळावर आयोजित विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली. ते म्हणाले, २०१७ पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दंगली होत असत. या दंगलखोरांवर एकमेव उपचार म्हणजे ‘दंडुका’. दंडुकाशिवाय ते मान्य करणार नाहीत. ते पुढे म्हणाले की, बंगाल जळत आहे हे तुम्ही पाहत असाल. तिथले मुख्यमंत्री गप्प आहेत. अरे, ते हट्टी लोक आहेत, कसे ऐकतील. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली या लोकांनी दंगलखोरांना स्वातंत्र्य दिले आहे. संपूर्ण मुर्शिदाबाद एका आठवड्यापासून जळत आहे, सरकार गप्प आहे. या प्रकारच्या अराजकतेला आळा घातला पाहिजे.
हे ही वाचा :
मुर्शिदाबादेत मारल्या गेलेल्या दास यांच्या कुटुंबावर केला होता ५०० जणांनी हल्ला!
सेन्सेक्सची १६०० अंकांनी उंच झेप!
“वक्फ मालमत्ता तृणमूल नेत्यांच्या, म्हणूनच बंगालमध्ये हिंसाचार”
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी १२५ वर्षे जुन्या कराराचा वापर; काय आहे करार?
ते पुढे म्हणाले, त्याठिकाणी सीआरपीएफला तैनात करण्याचे आदेश दिल्याबद्दल आणि हिंदूंचे रक्षण करण्यास सांगितल्याबद्दल तिथल्या न्यायालयाचा मी आभारी आहे. आज तिथे केंद्रीय सैन्य तैनात आहे. तेथील परिस्थिती आणि दुःखाबद्दल सर्वांना माहिती आहे, पण सगळे गप्प आहेत, काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीएमसी गप्प आहे. टीएमसी एकामागून एक धमक्या देत आहे. बांगलादेशात घडलेल्या घटनांचे निर्लज्जपणे ते समर्थन करत आहेत. जर त्यांना बांगलादेश आवडत असेल तर त्यांनी बांगलादेशला जावे, ते भारतीय भूमीवर ओझे का बनले आहेत?, असा सवालही मुख्यमंत्री आदित्यनाथ उपस्थित केला.