पुलवामा प्रमाणेच गंभीर परिस्थिती निर्माण करणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने एक सल्ला-वजा सूचना (अॅडवायजरी) जारी केली आहे. डीजीसीएने (नागरी उड्डाण महासंचालनालय) एअरलाईन्सना तिकीट दर न वाढवण्यास आणि रद्दीकरण शुल्क माफ करण्यासंबंधी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
अॅडवायजरीनुसार, पहलगाम घटनेनंतर आपल्या घरी परतण्यासाठी पर्यटकांची अनपेक्षित मागणी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, एअरलाईन्सना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी वाढलेल्या मागणीनुसार तात्काळ अधिक फ्लाइट्सची व्यवस्था करावी आणि श्रीनगरहून देशभरातील विविध ठिकाणी कनेक्टिव्हिटी अबाधित ठेवावी, जेणेकरून अडकलेल्या पर्यटकांना सहजपणे बाहेर काढता येईल.
हेही वाचा..
पहलगाम हल्लामुळे भीषण आठवणी ताज्या झाल्या
माजी ऑस्ट्रेलियन टेस्ट ओपनर कीथ स्टॅकपोल यांचे निधन
पाकिस्तानने हात केले वर! म्हणाले, आम्ही नाही त्यातले !!
पहलगामची घटना पाकिस्तानची पूर्वनियोजित रणनीती
याशिवाय, तिकीट रद्दीकरण आणि पुन्हा शेड्युलिंग शुल्काबाबत गंभीरपणे विचार करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. निवेदनात पुढे नमूद केले आहे की, “एअरलाईन्सनी रद्दीकरण आणि री-शेड्युलिंग शुल्क माफ करण्याचा विचार करावा आणि या कठीण काळात अनपेक्षित परिस्थितींना सामोरे जात असलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवावी.
इंडिगो एअरलाईन्सनेही या संदर्भात “एक्स” (पूर्वीचे ट्विटर) वर अॅडवायजरी पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे – “श्रीनगरमधील उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आम्ही श्रीनगर आणि जम्मूपासून प्रवास करणाऱ्या ग्राहकांच्या प्रवास योजनांमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मदत करण्यास कटिबद्ध आहोत. इंडिगोने पुढे सांगितले, “२२ एप्रिलपूर्वी केलेल्या बुकिंगसाठी आम्ही रद्दीकरण आणि पुनर्निर्धारण शुल्कात सवलत ३० एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर आज, २३ एप्रिल रोजी, आम्ही श्रीनगरसाठी आणि श्रीनगरहून दोन फ्लाइट्स चालवणार आहोत, ज्यात एक दिल्ली आणि दुसरी मुंबईहून असेल.”
माहितीप्रमाणे, मंगळवारी पहलगामच्या बैसारन व्हॅलीमध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला. देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याचा तीव्र निषेध होत आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या गटाने स्वीकारली आहे.