दादरचा महात्मा गांधी जलतरण तलाव गुदमरतोय

गढूळ पाण्यामुळे काहीकाळ बंद ठेवण्याची नामुष्की

दादरचा महात्मा गांधी जलतरण तलाव गुदमरतोय

एकीकडे मुंबई महानगरपालिकेचा भलामोठा अर्थसंकल्प जाहीर झालेला असताना दादर येथे असलेला ऑलिम्पिक दर्जाचा महात्मा गांधी जलतरण तलाव मात्र दिवसेंदिवस बुडीत खात्यात जाऊ लागला आहे. आता या तलावाचे पाणी गढूळ झाले असून गाळणी यंत्रणा बिघडल्यामुळे जलतरण तलाव काही काळ बंद ठेवण्यात आला आहे.

५० मीटर क्षमतेचा हा जलतरण तलाव बांधण्यात आला तेव्हा अनेक जलतरणपटू त्यातून घडतील अशी अपेक्षा होती पण वारंवार व्यवस्थापनाबाबत येणाऱ्या तक्रारी, पाण्याचा दर्जा, वाढते शुल्क, सदस्यांना होणारा मनस्ताप अशा अनेक कारणांमुळे हा जलतरण तलाव वादात राहिला आहे. मध्यंतरी शेजारच्या प्राणिसंग्रहालयातील मगर या तलावाच्या पाण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती. आता या तलावाचे पाणी गढूळ झाल्यामुळे ते पोहण्याच्या योग्यतेचे राहिलेले नाही.
सर्वाधिक श्रीमंत पालिकेच्या तलावांची स्थिती ही अशीच वाईट राहिलेली आहे.

ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावातील पाणी गढूळ झाल्यामुळे तो बंद ठेवण्याची नामुष्की ओढवल्यामुळे आता लोकांमध्ये नाराजी आणि हतबलता आहे.हा पूल गाळणी यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे बंद ठेवण्यात आल्याचा फलक आता बाहेर लावण्यात आला आहे.याआधीही अनेक सदस्यांनी तलावाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पत्र पाठवून जलतरण तलावाचे पाणी अधिक क्लोरिनयुक्त असल्याच्या तक्रारी करत त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे सदस्यांचे म्हणणे होते.

हे ही वाचा:

गणेश पालकर संघाने मिळवले विजेतेपद!

अभिनेता थलपथी विजयचा राजकारणात प्रवेश!

मशीद कमिटीची याचिका फेटाळली, ज्ञानवापीत पूजा सुरूच राहणार!

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; आरोग्य, पायाभूत सुविधा, प्रदूषण नियंत्रण यावर भर

शिवाय शुल्कात होणारी भरमसाठ वाढ ही देखील समस्या असल्याचे सदस्य सांगतात. २०१३ मध्ये हे वार्षिक शुल्क ४००० रु. होते ते आता १० वर्षात १०६१० रु. झाले आहे. हे शुल्क सर्वसामान्य माणसाला कसे परवडणार असा सवाल विचारला जात आहे.एकीकडे पालिकेच्या अखत्यारीतील बेस्ट बसेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अगदी कमी दरात तिकीट दिले जात असताना जलतरण तलावाचा लाभ घेण्यासाठी मात्र मोठी रक्कम शुल्क रुपात आकारली का जात आहे असा सवाल लोक विचारत आहेत.

हा जलतरण तलाव मुळात लोकांच्या आरोग्याचा विचार करून, त्यांच्या हितार्थ बांधला गेलेला असताना भरमसाठ शुल्क आकारणीमुळे सर्वसामान्य त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत, मग हा पालिकेच्या हेतूलाच हरताळ फासण्यासारखे नाही का असाही प्रश्न निर्माण होत आहे.आता तर हा तलाव बंद ठेवण्यात आला आहे. तो कधी सुरू होणार याची कल्पना देण्यात आलेली नाही.

Exit mobile version