छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी आज रायगडला भेट दिली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तसेच रायगडावर आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
उदयनराजे भोसले म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात समतेचा विचार दिला. सर्वधर्म समभावाचा विचार केला. त्यांनी आयुष्य इतरांसाठी वेचलं. स्वराज्याची स्थापना केली. त्याकाळी त्यांनी लोकांचा सहभाग राज्यकारभारत असला पाहिजे हा विचार दिला. आजच्या लोकशाहीचा मूळ पाया शिवाजी महाराजांनी रचला होता,” असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.
पुढे भाषण करताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक कायदा करण्यात यावा, जो नॉन बेलेबल असावा. १० वर्ष बेल मिळाली नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा. जेणेकडून कुठल्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. तसेच सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात एक सेंन्सर बोर्ड स्थापन करण्यात यावं. एखादा स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसतो. त्यामुळे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण होतो. यासाठी एक सेंसर बोर्डची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली.
हे ही वाचा..
ऊर्जा क्षेत्रावर केंद्रित जीसीसीमध्ये मोठी वाढ
मुजफ्फरपूरमध्ये पती ठरला हैवान
बीजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत काय घडले ?
तसेच रामायण सर्किट, बुद्ध सर्किट प्रमाणे शिवस्वराज्य सर्किट निर्माण करावं अशी महत्त्वाची मागणी त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिल्लीत स्मारक व्हावं, ही देखील मागणी त्यांनी केली. दावणगिरी जिल्ह्यातील शहाजी महाराजांच्या समाधीसाठी केंद्र आणि राज्याने निधी उपलब्ध करुन द्यावा. मुंबईत देखील स्मारक व्हावे. महाराष्ट्रात राज्यपालांच्या बंगल्याच्या ठिकाणी ४८ एकर जागा आहे. तिथे स्मारक झालं पाहिजे. स्मारक बनवण्यामागचा हेतू भावी पिढीला विचार घेता येईल हा असतो. देशाची प्रगती होईल हा त्यामागचा विचार असतो, असं उदयनराजे म्हणाले. या मागण्या पूर्ण झाल्यास आनंद होईल, असंही ते म्हणाले.