सूर्यकुमार टी-२०चा कर्णधार, शुभमनकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी

श्रीलंका दौऱ्यासाठी टी-२०, वनडे संघ जाहीर

सूर्यकुमार टी-२०चा कर्णधार, शुभमनकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी

श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० आणि वनडे मालिकेसाठी भारताचे दोन संघ गुरुवारी जाहीर करण्यात आले. नवे संघप्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली आता हा संघ या दौऱ्यात सामील होणार आहे. टी-२० संघाचे कर्णधारपद आता मुंबईकर सूर्यकुमार यादवकडे सोपविण्यात आले असून वनडेचे कर्णधारपद रोहित शर्माकडे राहील.
गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर हा पहिलाच दौरा असेल. २०२४मध्ये गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये तिसरे विजेतेपद पटकाविले. त्यानंतर आता ही नवी जबाबदारी गंभीर यांच्याकडे आहे. या नव्या जबाबदारीमुळे गंभीर यांनी कोलकात्यापासून फारकत घेतली आहे.

गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीने वऩडे आणि टी-२० स्पर्धेसाठी नव्या उपकर्णधारांचीही निवड केली. शुभमन गिल हा दोन्ही संघात उपकर्णधार असेल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील नुकत्याच झालेल्या मालिकेत शुभमन हा भारताचा कर्णधार होता. त्यात व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली भारताने झिम्बाब्वेला ४-१ अशी मात दिली होती.

भारतीय टी-२० संघाची जबाबदारी आता सूर्यकुमार यादवकडे असून हार्दिक पंड्याला मात्र ही संधी नाकारण्यात आली आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये या दोन्ही खेळाडूंनी कमाल केली होती. त्यामुळे हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद येईल, अशी शक्यता होती. मात्र त्याच्याकडे कर्णधारपद न देता सूर्यकुमारला ही संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माने टी-२० वर्ल्डकपनंतर टी-२० क्रिकेटला रामराम ठोकल्यामुळे तिथे कर्णधारपदाची जागा रिकामी झाली होती. अर्थात, वनडे मालिकेसाठी रोहितच भारताचा कर्णधार असेल.

हे ही वाचा:

यूपीएससी नापास, तरीही परराष्ट्र सेवेत असल्याचा बनाव… ज्योती मिश्राची चक्रावून टाकणारी कहाणी

जगातील लोकसंख्येला मुस्लिम जबाबदार, भारतातही तीच परिस्थिती !

उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात; दिब्रूगड एक्स्प्रेसचे १० डबे घसरले

धोतर परिधान केल्यामुळे शेतकऱ्याला प्रवेश नाकारणारा बेंगळुरू मॉल तात्पुरता बंद !

भारतीय संघ
टी-२०
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

वनडे
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, के.एल. राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

हार्दिक पंड्याचा घटस्फोट

हार्दिक पंड्याने आपली पत्नी नताशा स्टॅनकोविचपासून घटस्फोट घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचे स्पष्ट दिसत होते.
हार्दिक आणि नताशा यांचा विवाह ३१ मे २०२०ला पार पडला होता. त्यानंतर काही जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांनी १४ फेब्रुवारी २०२३ला पुन्हा विवाह केला. पण आता दोघांनी एकत्रितरित्या घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली.
आम्ही एकमेकांसोबत चार वर्षे राहिलो. एकमेकांना सगळे समर्पित केले. पण आता वेगळे होत आहोत. हा कठीण निर्णय आहे. आमचा मुलगा अगस्त्य हा आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू असेल. पालक म्हणून आम्ही दोघेही त्याच्या सर्व आशाअपेक्षा पूर्ण करू.

नुकत्याच झालेल्या अंबानी यांच्या पुत्राच्या विवाहसोहळ्यात हार्दिक सहभागी झाला होता पण त्याची पत्नी सोबत नव्हती. तसेच टी-२० वर्ल्डकप जिंकल्यावरही तिने हार्दिकचे अभिनंदन करणारी कोणतीही पोस्ट टाकली नाही. त्यावरून हे नाते तुटले असल्याचे स्पष्ट होत होते.

Exit mobile version