टी २० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने शानदारपणे धडक दिली आहे. आता भारताचा सामना होईल, तो इंग्लंडशी. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनीही भारताच्या कामगिरीचे कौतुक करून कर्णधार रोहित शर्मावर स्तुतीसुमने उधळली आहेत. ‘रोहित शर्माने मोठे षटकार खेचत आघाडी चांगली सांभाळली. आधीच्या षटकात विराट कोहलीला गमावूनही त्याने अशी कामगिरी केली. यातूनच भारताला लाभलेल्या कर्णधाराचे सामर्थ्य कळते आहे. सर्वांनी स्वतःच्या जास्तीत जास्त क्षमता जोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि संघासाठी सामने जिंकले पाहिजेत,’ असे गावस्कर म्हणाले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या भारतीय संघाने २० षटकांत २०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रोहितने या सामन्यात ४१ चेंडूंत ९२ धावांची वादळी खेळी खेळली. रोहितने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला. त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमला यात मागे टाकले. आता अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
या सामन्यासाठीही गावस्कर खूप उत्सुक आहेत. ‘मी या सामन्यासाठी खूप उत्सुक आहे. टी २० हा प्रकारच खूप उत्साहवर्धक असतो. खूप मनोरंजक असतो. तुम्हाला असे काही शॉट्स, फटके येथे दिसतात, जे तुम्हाला अन्य कोणत्याही प्रकारांत दिसणार नाहीत. तुम्हाला अशी काही गोलंदाजी बघायला मिळते, जी तुम्हाला कुठे दिसणार नाही. हा अतिशय एक्सायटिंग प्रकार आहे. आणि ज्या प्रकारे संघ खेळत आहेत, विशेषतः भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना ज्या प्रकारे रंगला, त्याला तोड नाही,’ अशी प्रतिक्रिया गावस्कर यांनी दिली.
पॉवरप्लेमध्ये विराट कोहली लवकर बाद होऊनही रोहितने चांगली खेळी केली. रोहितने मिचेल स्टार्कची गोलंदाजी फोडून काढली. त्याने मिचेलच्या एका षटकात २९ धावा काढल्या. त्याने स्टार्कच्या गोलंदाजीवर चार षटकार खेचले.