जम्मू आणि काश्मीमधील श्रीनगरमधील एका शाळेने विद्यार्थिनींना ‘अबाया’ घालून प्रवेश देण्यास नकार दिल्याने या विद्यार्थिनींनी आंदोलन केल्याची घटना घडली. श्रीनगरमधील विश्व भारती उच्च माध्यमिक विद्यालयातील अनेक विद्यार्थिनींनी आबाया परिधान करून संस्थेत प्रवेश नाकारल्याचा आरोप करत गुरुवारी प्रशासनाविरोधात आंदोलन केले.
एका सैलसर, पूर्ण लांबीच्या झग्याला ‘अबाया’ म्हटले जाते. हा वेष मुस्लिम महिला परिधान करतात. ‘आम्हाला अबाया घालायचा असेल तर आम्हाला मदरशात जा, असे सांगितले जाते. आम्हाला शाळेत प्रवेश दिला जात नव्हता,’ असे निदर्शने करणाऱ्यांपैकी एका विद्यार्थिनीने सांगितले. तर, ते ‘अबाया’ घालून शाळेचे वातावरण खराब करत आहेत, असे मुख्याध्यापकांनी म्हटले आहे, असा आरोप या विद्यार्थिनींनी केला.
मात्र शाळेचे मुख्याध्यापक मेमरोज शफी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘विद्यार्थी घरापासून शाळेत येताना अबाया घालू शकतात, परंतु त्यांनी ते शाळेच्या आवारातच काढावेत. आम्ही त्यांना लांब पांढऱ्या रंगाचा हिजाब किंवा मोठा दुपट्टा घालायला सांगितले, कारण तो शाळेच्या गणवेशाचा भाग आहे. ते रंगीबेरंगी, वेगवेगळ्या डिझाइनचा अबाया घालून येतात, जे गणवेशाचा भाग नसतात,’ असे ते म्हणाले. शाळेत येताना ड्रेस कोडचे पालन केलेच पाहिजे, असे मुख्याध्यापक म्हणाले. मात्र यावरून अन्य पक्षांनी टीकेची झोड उडवली आहे.
हे ही वाचा:
तुमचाही दाभोलकर होणार; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
त्या रेल्वे पोलिसांनी चार महिन्यांत ५३ जणांचे जीव वाचवले!
निर्मला सितारामन यांच्या मुलीचा अत्यंत साधेपणाने विवाह
पाकिस्तान सीमेवर ३७ कोटींचे हेरॉईन जप्त
नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) मुख्य प्रवक्ते तन्वीर सादिक म्हणाले की, मुस्लिमबहुल जम्मू-काश्मीरमध्ये अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. ही वैयक्तिक निवड असावी आणि धार्मिक पोशाखाच्या बाबतीत कोणताही हस्तक्षेप नसावा,’ असे सादिक यांनी ट्वीटटमध्ये म्हटले आहे. शाळेच्या या आदेशाचा त्यांनी विरोध केला. तसेच, परिस्थिती बिघडण्यापूर्वी तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले.