‘जगभरात वादळी परिस्थिती; भारताला नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानांची गरज’

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘जगभरात वादळी परिस्थिती; भारताला नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानांची गरज’

‘ज्या प्रकारच्या घटना जागतिक पातळीवर होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही वादळी परिस्थिती असल्याचे दिसत आहे. याला सामोरे जाण्यासाठी मजबूत नेतृत्वाची गरज आहे. तयारीची आवश्यकता आहे. व्यवस्थेमध्ये बदलाची गरज आहे,’ असे प्रतिपादन करत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचे कौतुक केले.

‘हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट २०२३’च्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. जयशंकर यांनी गेल्या दशकभरातील भारताची घोडदौड आणि आत्मविश्वासामध्ये झालेल्या वाढीचा उल्लेख केला. भारत आता अधिक आत्मविश्वासपूर्ण पावले टाकत आहे. आव्हानांपासून मागे हटण्याची प्रवृत्ती आता देशात नाही, असेही ते म्हणाले.‘आता आपण अशा स्तरावर पोहोचलो आहोत, जिथे आपण समस्यांकडे दुर्लक्ष करत नाहीत.

हे ही वाचा:

बुडत्याचा पाय खोलात, आता ड्रग्ज प्रकरणीही आरोप

मोदी सरकारचा मोठा निर्णय; मोफत रेशन योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ

गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य

छत्तीसगडमधील काँग्रेसने तर ‘महादेव’लाही सोडले नाही!

तर, त्याला सामोरे जातो. उदा. आपण इस्रायल, सुदान आणि युक्रेनमध्ये बचाव मोहिमा राबवल्या,’ याचीही त्यांनी आठवण करून दिली. जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यामुळे झालेल्या दूरगामी परिणामांचाही त्यांनी लेखाजोखा मांडला. करोनाच्या साथीचा सामना करण्यासाठी राबवलेले विविध उपाय आणि कठीण राजकीय प्रयत्नांचाही त्यांनी ऊहापोह केला.

जयशंकर यांनी भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवरही प्रकाश टाकला. त्यांच्याशी कायमस्वरूपी संबंध प्रस्थापित करण्यासाठी जे काही अडथळे येत आहेत, ते दूर करण्याचे प्रयत्न भारतातर्फे सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या तीन वर्षांत भारतात एआय डोमेन, चिपच्या निर्मितीला वेग आला आहे. जर भारत या स्मार्ट उत्पादननिर्मितीत उतरेल, तर केवळ अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला देण्यासाठी भारताकडे बरेच काही असेल, असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.

Exit mobile version