उजनी धरण पात्रात बोट उलटून सहा जणांना जलसमाधी!

उजनी धरण पात्रात बोट उलटून सहा जणांना जलसमाधी!

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण पात्रात मंगळवार, २१ मे रोजी संध्याकाळी वादळी वारा आणि पावसामुळे बोट उलटून मोठी दुर्घटना घडली होती. मंगळवार संध्याकाळपासून ते बुधवार सकाळपर्यंत शोध मोहीम सुरू होती. सहा जण या दुर्घटनेमुळे बेपत्ता होते. अखेर यासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. बोटीतील सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

करमाळा तालुक्यातील कुगाव येथील सात जणं बोटीने इंदापूर तालुक्यातील कळशी येथे जाण्यासाठी निघाले होते. या दरम्यान जोरदार हवा सुरू झाली आणि पावसानेही हजेरी लावली. वादळीवाऱ्याने ही बोट उलटली. या बोटीत एकूण सात प्रवासी होते. त्यातील एका प्रवाशाला पोहता येत असल्याने तो पोहत किनाऱ्यावर आला. मात्र, बाकीचे बेपत्ता होते. याची माहिती मिळताच मंगळवारी संध्याकाळी शोधकार्याला सुरुवात झाली होती. रात्री शोध मोहिम थांबविण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली.

दरम्यान बुडालेली बोट सापडली. एनडीआरएफच्या पथकाने शोध मोहिम राबविल्यानंतर सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बुडालेली बोट कळाशी या ठिकाणी ओढून नेण्यास सुरुवात केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

‘भाजपला आधीच ३१० जागा मिळाल्या आहेत, उर्वरित दोन टप्प्यांत ४०० ओलांडणार’

पुणे गाडी अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध?

भाजप ३०० जागा पार करेल, पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी नाही!

संथगती मागचे सत्य, बिघाडा मागचा बोभाटा…

उजनी जलाशय क्षेत्रातील कुगाव (ता. करमाळा) येथून अवघ्या काही अंतरावरील कळाशी आणि आजोती (ता. इंदापूर) येथे मंगळवारी सायांकाळी निघालेल्या बोटीत सात जण बसले होते. परंतु, पुढे थोड्याच वेळात अचानकपणे वादळी वाऱ्यासह वावटळ आली. यात बोट हेलकावे खाऊन जलाशयात बुडाली. यात गोकुळ दत्तात्रेय जाधव (वय ३०) आणि त्यांच्या पत्नी कोमल (वय २५) यांच्यासह शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष) आणि माही गोकुळ जाधव (वय ३) तसेच अनुराग अवघडे (वय ३५) आणि गौरव धनंजय हजारे (वय १६) हे सहाजण बेपत्ता झाले. याच बोटीतून प्रवास करणारे सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील फौजदार राहुल डोंगरे हे पोहत कळाशी येथे जलाशयाच्या किनाऱ्यावर पोहोचले. त्यांनी दुर्घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली.

Exit mobile version