सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न आता पूर्ण करायचेय!

स्वप्नील कुसाळेने व्यक्त केला विश्वास

सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न आता पूर्ण करायचेय!

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ब्राँझपदक जिंकणारा कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे आता प्रसिद्धीच्या झोतात आहे. ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर तो लोकप्रिय झाला आहे. त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांच्या उड्या पडत आहेत. मात्र स्वप्नील स्वतःला सेलिब्रिटी मानत नाही. आपण अजूनही सर्वसामान्यच आहोत, असे तो म्हणतो आणि ब्राँझपदक मिळविल्यानंतर आपले कर्तव्य पार पडले असे न मानता पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची स्वप्नपूर्ती करणार असल्याचा निश्चयही बोलून दाखवतो.

एमआरएकडून ५ लाख

महाराष्ट्र रायफल असोसिएशनने (एमआरए) स्वप्नीलच्या या स्वप्नवत कामगिरीचा गौरव करण्यासाठी रविवारी खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी स्वप्नीलने पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. स्वप्नीलला एमआरएच्या वतीने ५ लाखांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. शिवाय, त्याच्या प्रशिक्षक व माजी ऑलिम्पियन दीपाली देशपांडे तसेच पॅरिसमधील भारतीय एअर रायफल नेमबाजी संघाच्या प्रशिक्षक सुमा शिरूर यांनाही प्रत्येकी एक लाखाचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे धनादेश मान्यवरांना प्रदान करण्यात आले.

स्वप्नील म्हणाला की, माझे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही. खूप मोठी कामगिरी करून दाखवली आहे, असे मला वाटत नाही. अजून खूप मोठी मजल मारायची आहे. पण यानंतरही मी आधी होतो तसाच आहे. माझ्या वागण्यात बदल झालेला नाही. आगामी काळात माझ्यावर कोणताही दबाव असेल असे नाही. कारण सुवर्णपदक जिंकणे माझे स्वप्नच आहे. त्याला मी दबाव म्हणणार नाही. आणखी मेहनत घ्यायची आहे. ते करत राहणार आहे.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये चकमक, सीआरपीएफचा अधिकारी हुतात्मा !

लाडक्या बहिणींचे आशीर्वाद फळणार का?

चांदीवलीत कट्टरपंथीकडून तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार !

कोलकाता बलात्कारित तरुणीच्या शवविच्छेदन अहवालातून आले भयानक सत्य समोर

स्वप्नील म्हणाला की, मी देशासाठी काहीतरी केलं याचा गर्व आहे. माझाही वाटा आहे देशाचे नाव उंचावण्यात याचा अभिमान वाटतो. देशाचे, महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल व्हावे असाच माझा प्रयत्न असतो. त्यात माझे प्रशिक्षक सपोर्ट स्टाफ यांनी मला मोलाचे सहकार्य केले. त्यांच्यामुळेच मला पदक मिळाले.

देवाची कृपाही आहेच!

जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा काय वाटते, या प्रश्नावर स्वप्नील सांगतो की, आईवडिलांनी माझ्यासाठी खूप कष्ट उपसले आहेत. आईवडिलांचा आशीर्वाद आहे. त्यांनी कधी काही कमी पडू दिले नाही. त्यांच्याबद्दल किती बोलावे ते कमीच. देवाच्या कृपेमुळेच हे शक्य झाले. आईसुद्धा देवावर विश्वास ठेवते. मी जेव्हा स्पर्धेसाठी जातो तेव्हा नेहमीच देवाची आराधना करतो आणि सामन्यासाठी सज्ज होतो.

आपल्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांच्याबद्दलही भावनिक होत स्वप्नील म्हणतो की, त्या माझ्यासाठी आईप्रमाणेच आहेत. त्यांच्याकडून खूप मार्गदर्शन मिळाले. एका मुलासारखेच त्यांनी मला दिशा दिली. दीपाली देशपांडे यांना टोकियो ऑलिम्पिकनंतर राष्ट्रीय प्रशिक्षकपदावरून पायऊतार व्हावे लागले होते. पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या स्वप्नीलसारख्या खेळाडूने आपल्या प्रशिक्षकाचा विश्वास सार्थ करून दाखवला.

सप्टेंबरपासून मी माझ्या सरावाला पुन्हा सुरुवात करीन असे सांगताना नेमबाजी या खेळाचे फायदेही स्वप्नील सांगतो. तो म्हणतो की, नेमबाजी हा खेळ काही लोकांना कंटाळवाणा वाटतो. पण नेमबाजी खेळामुळे एक शिस्त येते. एक शांतता लाभते. शिवाय हा खेळ खेळताना सुरक्षितता हा महत्त्वाचा पैलू लक्षात ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे आपोआपच आपला सर्वांगीण विकास या खेळामुळे होत असतो.
महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित तसेच सरचिटणीस शीला कानुंगो हेदेखील यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version