रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना निवृत्तीनंतर मोठी जबाबदारी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव- २ म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ६ वर्षे आरबीआय गव्हर्नर म्हणून काम केल्यानंतर, शक्तीकांत दास डिसेंबर २०२४ मध्ये निवृत्त झाले होते.
सरकारने शनिवारी माजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव- २ म्हणून नियुक्ती केली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने एका आदेशात म्हटले आहे की, शक्तिकांत दास यांची नियुक्ती ते पदभार स्वीकारल्यापासून प्रभावी होईल. तसेच आदेशानुसार, त्यांच्या कार्यकाळाचा कालावधी पंतप्रधानांच्या कार्यकाळाइतकाच किंवा पुढील आदेश येईपर्यंत राहील. माजी आयएएस अधिकारी पीके मिश्रा ११ सप्टेंबर २०१९ पासून पंतप्रधानांचे पहिले प्रधान सचिव म्हणून काम पाहत आहेत. दास आता दुसरे प्रधान सचिव असतील.
हे ही वाचा..
तेलंगणामध्ये बोगद्याचा भाग कोसळून अपघात; सहा मजूर अडकले
… आणि ऑस्ट्रेलिया- इंग्लंड मॅचआधी लाहोरच्या मैदानात वाजलं भारताचे राष्ट्रगीत!
बांगलादेशींनी वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरेंना निवडून आणलं
उत्तर प्रदेशातील ९०,००० कैद्यांनी केले पवित्र स्नान!
भुवनेश्वर येथे २६ फेब्रुवारी १९५७ रोजी शक्तिकांत दास यांचा जन्म झाला. त्यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहासात बॅचलर आणि मास्टर्स पदवी पूर्ण केली. ते १९८० च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे माजी आयएएस अधिकारी आहेत आणि त्यांनी तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये विविध भूमिका बजावल्या आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये शक्तिकांत दास यांनी २५ वे आरबीआय गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. कोविड- १९ महामारी, भू- राजकीय तणाव आणि उच्च चलनवाढ यासारख्या अशांत काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता आणण्यासाठी त्यांचे नेतृत्व सर्वत्र ओळखले जाते. ते गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी १९९० च्या राजस्थान केडरचे माजी आयएएस अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती झाली. २०२१ मध्ये, दास यांना सार्वजनिक प्रशासनातील योगदानाबद्दल उत्कल विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट.) ही पदवी प्रदान केली होती.