स्वस्तिक साईराज-चिरागने रचला इतिहास

सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणारी पहिली भारतीय जोडी

स्वस्तिक साईराज-चिरागने रचला इतिहास

स्वस्तिक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी रविवारी इतिहास रचला. जकार्ता येथे झालेल्या सुपर १००० या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद या जोडीने पटकाविले. अशी कामगिरी करणारी ही भारताची पहिली जोडी ठरली आहे.
गेल्या वर्षी या जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी ब्राँझपदक विजेती कामगिरी केली होती. त्या कामगिरीत आता आणखी एका कामगिरीची भर पडली असून या अंतिम सामन्यात त्यांनी मलेशियाच्या ऍरन चिया-सोह वूई यिका यांना नमविले.

इंडोनेशियन ओपन स्पर्धेत मिळविलेला हा विजय वेगळ्या दर्जाचा विजय आहे. कारण हे विजेतेपद पटकाविणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटूंची जोडी आहे. सायना नेहवाल (२०१०, २०१२) आणि किदाम्बी श्रीकांत यांनी इंडोनेशियन ओपन स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद पटकाविले होते. पण दुहेरीचे विजेतेपद अद्याप भारताला जिंकता आले नव्हते.

स्वस्तिक आणि चिराग यांनी ही लढत २१-१७, २१-१८ अशा फरकाने दोन गेममध्येच जिंकली. भारतीयांनी या सामन्यात सुरुवात संथपणे केली पण नंतर त्यांनी आपल्या खेळाचा वेग वाढवत नेला. हे या दोघांचे पहिले सुपर १००० विजेतेपदही आहे.

हे ही वाचा:

छत्तीसगडमध्ये महिला काँग्रेस नेत्यांने केले हिंदुराष्ट्रासाठी आवाहन

‘आपत्ती व्यवस्थापनात भारत एक मोठी जागतिक शक्ती’

काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते हे बोलण्याचा पालिकेला अधिकारच काय?

मलेशियाचे हे स्पर्धक जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेते होते तसेच ते आशियाई विजेतेही होते. त्यामुळे त्यांना पराभूत करण्याचे मोठे आव्हान भारतीय जोडीवर होते, ते त्यांनी पेलले. भारतीय जोडी सुरुवातीच्या गेममध्ये अडखळली पण नंतर त्यांनी ११-९ अशी आघाडी घेण्यात यश मिळविले. दुसऱ्या गेममध्ये मात्र स्वस्तिक-चिराग जोडीने वर्चस्व मिळविले. पण नंतर मलेशियाच्या जोडीने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना कुरघोडी करता आली नाही.

 

स्वस्तिकने या सामन्यानंतर सांगितले की, या स्पर्धेसाठी आम्ही जय्यत तयारी केली होती. आम्हाला ठाऊक होते की, चाहत्यांचा पाठिंबा आम्हाला मिळेल. हा संपूर्ण आठवडा आमच्यासाठी अविस्मरणीय असाच होता. शिवाय, या सामन्यात आम्ही जबरदस्त कामगिरीही करून दाखविली. या दोघांविरोधात आमची यापूर्वीची कामगिरी पुरेशी समाधानकारक नव्हती. त्यामुळे अगदी सावधपणे खेळ करण्याचे आम्ही ठरविले होते. त्याची प्रचीती आम्हाला आली.

 

बॅडमिंटनच्या जागतिक स्पर्धा सहा स्तरात विभागण्यात आल्या आहेत. त्यात वर्ल्ड टूर अंतिम फेरी, चार सुपर १०००, सहा सुपर ७५०, सात सुपर ५०० आणि ११ सुपर ३०० अशा स्पर्धांचा समावेश आहे. सुपर १०० या स्पर्धेतून खेळाडूंना रँकिंग गुण मिळतात. सुपर १००० या स्पर्धेत अधिक गुण मिळतात शिवाय भरभक्कम बक्षिसेही असतात.

Exit mobile version