ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू वसंत ढवण यांचे वृद्धापकाळाने निधन

फिनिक्स मिलकडून १०वर्ष ते कबड्डी खेळले

ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू वसंत ढवण यांचे वृद्धापकाळाने निधन

महाराष्ट्राचे जेष्ठ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू वसंत ढवण यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सावित्रीबाई, तीन मुलगे, मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांना अचानक अस्वस्थ वाटल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ढवण हे मूळचे कणकवलीचे. परिस्थितीमुळे ते वयाच्या १४व्या वर्षी मुंबईला आले. मामा शिवराम पिळणकर यांच्या आश्रयाला ते राहिले. लोअर परेल येथील श्रीराम कबड्डी संघाकडून त्यांनी कबड्डी खेळाला सुरुवात केली.

फिनिक्स मिलकडून १०वर्ष ते कबड्डी खेळले. त्यानंतर काही काळ लक्ष्मीरतन या संघाकडून व त्यानंतर त्यांना महिंद्र संघाकडून खेळाडू म्हणून नोकरी देण्यात आली. अमृतसर येथे १९६१साली झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ते प्रथम महाराष्ट्रा कडून खेळले. त्यानंतर जबलपूर(१९६२), अलाहाबाद(१९६३), कोल्हापूर – महाराष्ट्र(१९६४), हैद्राबाद(१९६५), बडोदे(१९६६) अशा सलग ६स्पर्धेत ते महाराष्ट्राकडून खेळले. पण त्यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी १९७०साली लाभले. डावा कोपरा रक्षक असलेले ढवण चवढा व बॅक काढण्यात माहिर होते. ते अष्टपैलू खेळाडू होते. उजवी चढाई करणारे ढवण हाताने चांगल्या प्रकारे गडी टिपत.

हे ही वाचा:

मुस्लिम आता व्होट बँक राहिलेल्या नाहीत?
राखी सावंत अडचणीत, समीर वानखेडेंकडून मानहानीचा खटला दाखल!
प्युअर व्हेज फ्लीट सेवेच्या ‘टी-शर्ट’ वरून झोमॅटोचा युटर्न!
हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन भाजपात!
विरार येथे ढवण यांनी श्रीराम कबड्डी संघाची स्थापना केली होती. त्या संघाचा महाराष्ट्रात दबदबा आजही आहे. मुंबईच्या ओम् कबड्डी प्रबोधिनीने त्यांना सन्मानित केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील छत्रपती पुरस्कार प्राप्त संघटनेने पहिल्याच वर्षी त्यांना “कबड्डी योद्धा” हा पुरस्कार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते देऊन त्यांचा यथोचित गौरव केला होता. महाराष्ट्र शासनाचा “शिवछत्रपती पुरस्कार” उशीरा सुरू झाल्याने त्यांना तो मिळू शकला नव्हता. याची खंत ते नेहमी बोलून दाखवीत. विरार येथील विराट मैदानाच्या बाजूला असलेल्या हिंदू स्मशान भूमीत सायं. ७-०० सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Exit mobile version