शतकपूर्तीकडे आरएसएस… राज ठाकरेंनी दिला मान, उद्धवना मात्र फुटला घाम!

शतकपूर्तीकडे आरएसएस… राज ठाकरेंनी दिला मान, उद्धवना मात्र फुटला घाम!

दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट टाकली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे कौतुक केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ९९ वर्षे पूर्ण करत १००व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल राज ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले.

राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, ‘एखाद्या संघटनेने १०० वर्षे सलग कार्यरत राहणे हे मला अचंबित करणारे आहे. देशात कोणीतही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असतो, हे मी अनेकदा पाहिलं आहे. संघातील बर्‍याच स्वयंसेवक व प्रचारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणं, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणं, यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित आहे. मुळात एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही.’ राज ठाकरे यांनी केलेली ही पोस्ट अगदी खरी आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील असंख्य कार्यकर्ते झोकून देऊन काम करताना दिसतात. दुर्गम भागात, प्रतिकूल परिस्थितीत काम करताना ते दिसतात. निस्वार्थ वृत्तीने त्यांचे हे कार्य सुरू असते. प्रसंगी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून ते काम करत असतात. त्यासाठी आपल्याला प्रसिद्धी मिळावी, कुणी त्याची दखल घ्यावी अशीही साधी अपेक्षा नसते. मग एखाद्या आदिवासी पाड्यात असो की इशान्य भारतातील दुर्गम प्रदेशात असो, संघ स्वयंसेवकांचे काम सुरू असते. अनेक संकटे ओढवली तरी ते चिकाटीने तिथे कार्यरत राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी भावना अगदी योग्यच म्हणावी लागेल. करोनाच्या काळात आपण संघ स्वयंसेवकांनी केलेले कार्य पाहिलेले आहे. अगदी बरखा दत्तसारख्या मोदीविरोधक पत्रकारालाही संघ स्वयंसेवकांनी धारावीत केलेल्या कामाची दखल घ्यावी लागली होती. केरळमध्ये जे भूस्खलन झाले, त्यावेळीही सर्वात आघाडीवर संघ स्वयंसेवकच होते. एका स्वयंसेवकाला विचारण्यात आले तेव्हा आपण इथे जोपर्यंत एखादी व्यक्ती जिवंत असल्याची शक्यता आहे, तोपर्यंत बचावकार्य करत राहणार असे म्हटल्याचे समोर आले होते. यावरून त्यांची कामाप्रती, राष्ट्राप्रती निष्ठा दिसून येते. हे असे कार्य त्यांनी १०० वर्षे केलेले आहे.

एकीकडे राज ठाकरे आपले मत व्यक्त करत असताना त्यांचे बंधू उद्धव ठाकरे मात्र संघाला १००व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल मनमोकळेपणाने शुभेच्छाही देऊ शकत नाहीत. उद्धव ठाकरे म्हणतात की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १००व्या वर्षात पदार्पण केले. मला मोहन भागवतांबद्दल आदर आहे, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाबद्दल आदर नाही. गेली १० वर्षे भाजपाने हिंदूंना संघटित केलेले नाही. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यात त्यांची संभ्रमित अवस्था दिसते. एकीकडे ते मोहन भागवत यांच्याबद्दल आदर व्यक्त करतात मात्र संघाबद्दल ते आदर व्यक्त करू शकत नाहीत. हे विचित्रच आहे. शिवाय, भाजपाला १० वर्षांत हिंदू संघटित करता आला नाही, असेही ते म्हणतात. पण स्वतः आपली संघटना हिंदुत्ववादी असल्याचा दावा करणारे उद्धव ठाकरे आपण किती हिंदूंची एकजूट केली हे सांगू शकत नाहीत.

उद्धव ठाकरे हे संघाच्या शतकपूर्तीच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीबाबत स्पष्टपणे अभिनंदनही करू शकत नाहीत, याचा अर्थ स्पष्ट आहे की ते दबावाखाली आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सत्तेत स्थान मिळविल्यानंतर आणि आता महाविकास आघाडीच्या प्रयोगातील महत्त्वाचा घटक बनल्यानंतर त्यांची हिंदुत्वाशी नाळ तुटली आहे. त्यापेक्षाही ते मुस्लिम मतांवर आता अधिक विसंबून आहेत. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला आहे. हे पाहता त्यांना थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती करणे शक्य होणारे नाही. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत एकगठ्ठा मुस्लिम मते मिळविण्यासाठी त्यांना आरएसएसची स्तुती करण्यावर आपोआपच बंधने आली आहेत. त्यामुळे एकीकडे मोहन भागवतांबद्दल आदर आहे असेही म्हणायचे आणि संघाच्या कामाबद्दल मात्र आदर नाही असेही म्हणायचे, अशी दुहेरी कसरत उद्धव ठाकरेंना करावी लागते आहे.

हे ही वाचा:

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी हत्येत रियल इस्टेटमधील बड्या विकासकाच्या नावाची चर्चा

बाबा सिद्दीकींची घटना गंभीर, पण शरद पवारांच्या नजरेसमोर केवळ ‘सत्तेची खुर्ची’

बाबा सिद्दीकी हत्या: आरोपीची आजी म्हणते, ‘चौकात उभे करून गोळी घाला’

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ!

दसऱ्याच्या शिवतीर्थावरील भाषणात उद्धव ठाकरे यांना आपण सत्तेत पुन्हा आल्यास जिल्ह्याजिल्ह्यात शिवाजी महाराजांची मंदिरे उभी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. ही घोषणा आताच त्यांना करावीशी का वाटली? याआधी अडीच वर्षे सरकार असताना त्यांनी कधी ही घोषणा केली नाही. आता मुस्लिम मते सोबत येतील याची खात्री आहे, पण हिंदू मते दूर होऊ नयेत याची ते काळजी घेत असावेत. त्यामुळेच संघाला शुभेच्छा देण्याऐवजी कसरती करण्यातच ते धन्यता मानत आहेत.

खरे तर, २०१२मध्ये राज ठाकरे यांनी एक मोर्चा काढला होता. त्यावेळी रझा अकादमीने म्यानमारच्या मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात मोर्चा काढल्यानंतर त्यात प्रचंड तोडफोड झाली, महिला पोलिसांवर हात टाकला गेला, अमर जवान ज्योतीच्या स्मारकाची तोडफोड केली गेली. त्यावेळी आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन हे अत्यंत गंभीर असल्याचे त्यांना सांगितले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनीही या तोडफोडीविरोधात मोर्चा काढला. त्यावरून राज ठाकरे हे देशहित, हिंदूहिताची काळजी घेणारे आहेत, हे स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे मात्र ते आता विसरून गेले आहेत. हा या दोन नेत्यांमधला फरक यानिमित्ताने समोर आला आहे.

Exit mobile version