पुढील आठवडाभर राज्यात पावसाचा अंदाज, अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य

५ ते ७ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

पुढील आठवडाभर राज्यात पावसाचा अंदाज, अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य

उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे पुढील ५ ते ७ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यभरात गेल्या महिनाभरात दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात आजपासून तर राज्यात येत्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय कोकण किनारपट्टीलगत आजपासून पावसाचा जोर देखील वाढणार आहे. कोकणा पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यांतील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मराठवाड्यातही दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

 

दरम्यान महिनाभरापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांकडे पावसाने दडी मारली आहे. पाऊस न पडल्याने खरीप हंगामातील पिके करपू लागली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट ओढावले आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

 

हे ही वाचा:

रोव्हर प्रज्ञानने घेतली चंद्राची रंगीबेरंगी छायाचित्रे

विशेष अधिवेशनाचे काम दुसऱ्या दिवसापासून नव्या इमारतीत

राष्ट्रपतींच्या जी २० निमंत्रणाआधी ‘भारत’ नाव ब्रिक्सच्या अधिसूचनेतही

इंडिया आघाडीच्या पुढील बैठकांना पूर्णविराम; संजय राऊतांनी सांगितले कारण

मुंबई-पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट

ऑगस्टमध्ये अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठ्यात जेमतेम वाढ झाली आहे. १ ऑक्टोबरपर्यंत हे जलाशय शंभर टक्के न भरल्यास मुंबई शहरवासीयांना दहा ते पंधरा टक्के पाणीकपातीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, पुण्यातील खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या क्षेत्रात पाऊस गायब झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस समाधानकारक न पडल्यास धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेऊन पुणेकरांना पुन्हा पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

 

१ ऑक्टोबरपर्यंत हे जलाशय शंभर टक्के हे धरण भरल्यास मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागेल. मुंबईकरांना महापालिकेच्या अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर, भातसा, विहार, तुळशी आणि मध्य वैतरणा अशा सात धरणांमधून दरदिवशी ३७५० दशलक्ष लिटर्स एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणांमध्ये आतापर्यंत ९०.६९ टक्का इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी या सर्व धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार, ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. ३ सप्टेंबर २०२३ रोजी १३ लाख १२ हजार ६७३ दशलक्ष लिटर्स अर्थात ९०.७४ टक्के इतका पाणीसाठी जमा आहे.

 

 

महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट

ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने मराठवाडा व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. १२२ वर्षातील कोरडा ऑगस्ट म्हणून या महिन्याची नोंद झाली आहे. पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. सर्वात पाऊस ज्या ठिकाणी पडतो तो मावळही यंदा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे पवना धरण क्षेत्रात शून्य टक्के पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागावे लागत आहेत. पावसाने दडी मारल्याने त्याचा फटका पिकांना बसला आहे. समाधानकारक पाऊस काही दिवसात न पडल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.

 

 

अल निनोचा प्रभाव

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी अल निनोचा प्रभाव जास्त दिसून येत आहे. १९०१ नंतरचा म्हणजे गेल्या १२२ वर्षांमधील सर्वात कोरडा ऑगस्ट महिना अशी या महिन्याची नोंदही झाली आहे. त्यामुळं सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊसामुळे चिंतेत भर टाकली आहे. येत्या काळातही पाऊस कमी पडल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

 

काही भागात पावसाचे पुनरागमन

राज्यात पुन्हा मोसमी पाऊस सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. ५ सप्टेंबरनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात मोसमी पाऊस अंशत: सक्रिय झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार ते मध्यम पावसाची नोंद झाली. विदर्भात ६ सप्टेंबरपर्यंत पिवळा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोकणात त्या तुलनेत कमी पाऊस राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

 

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा सक्रीय होणार आहे. राज्यात येत्या २ ते ३ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. यामुळे पुढील ५ ते ७ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Exit mobile version