५३ वर्षांनंतर विशाखापट्टणम किनाऱ्यावर सापडले पीएनएस गाझीचे अवशेष

५३ वर्षांनंतर विशाखापट्टणम किनाऱ्यावर सापडले पीएनएस गाझीचे अवशेष

पाकिस्तानी पाणबुडी पीएनएस गाझीचे अवशेष तब्बल ५३ वर्षांनंतर विशाखापट्टणम किनाऱ्यावर सापडले आहेत. भारतीय नौदलाच्या ‘इंडियन नेव्ही डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेइकल’ला (DSRV) भारत-पाकिस्तान युद्धातील पाकिस्तानच्या पीएनएस गाझी या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. पाकिस्तानची ही पाणबुडी ४ डिसेंबर १९७१ रोजी भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात बुडाली होती. भारतीय विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानने गुप्तपणे ही पाणबुडी पाठवली होती. या पाणबुडीचे अवशेष समुद्रकिनाऱ्यापासून साधारण २ ते २.५ किमी अंतरावर १०० मीटर खोल समुद्रात आढळले आहेत. दरम्यान, भारतीय नौदल पाणबुडीच्या या अवशेषांना बाहेर काढणार नाही.

भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानची पीएनएस गाझी ही पाणबुडी पाकिस्तानच्या कराची येथून १४ नोव्हेंबर १९७१ रोजी ९३ जणांना घेऊन विशाखापट्टनमकडे निघाली होती. गाझीने ४८०० किमीचे अंतर यशस्वीपणे पार केले होते.  मात्र विशाखापट्टनमच्या किनाऱ्यावरच ही पाणबुडीला जलसमाधी मिळाली. भारत-पाकिस्तान युद्धातील ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. पीएनएस गाझी पाणबुडीच्या मदतीने पाकिस्तान भारताच्या आयएनएस विक्रांत या जहाजावर हल्ला करणार होता. मात्र पाकचा हा डाव फसला. या पाणबुडीला विझाग समुद्रकिनाऱ्याकडे जायचे होते.

हेही वाचा :

लोकसभा निवडणुकीच्या तारखा १३ मार्चनंतर जाहीर होण्याची शक्यता

केंद्राकडून शेतकऱ्यांना पुन्हा चर्चेचे आमंत्रण

जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळतोय

धक्कादायक! नवजात बाळ रडू नये म्हणून तोंडाला लावली ‘टेप’!

आयएनएस गाझीला जलसमाधी
भारतीय नौदलाने पीएनएस गाझीला अडकवण्याची युक्ती खेळली आणि आयएनएस विक्रांतला अंदमान-निकोबार बेटांजवळ सुरक्षित ठिकाणी हलवले. पाकिस्तानची ही योजना हाणून पाडण्यासाठी भारताने आपली आयएनएस राजपूत ही युद्धनौका पाठवली होती. या युद्धनौकेने पाकिस्तानच्या पीएनएस गाझी या पाणबुडीचा शोध घेत तिच्यावर हल्ला केला. परिणामी त्या पाणबुडीला जलसमाधी मिळाली.

पाकिस्तानला मात्र हे मान्य नाही. पीएनएस गाझीमध्ये तांत्रिक बिघाड होऊन स्फोट होऊन तिला जलसमाधी मिळाली, असे पाकिस्तानचे मत आहे. बंगालच्या खाडीजवळ विझागजवळ फक्त पीएनएस गाझी ही एकच पाणबुडी बुडालेली नाही. याच भागात जपानच्या आरओ-११० नावाच्या पाणबुडीला जलसमाधी मिळालेली आहे. दुसऱ्या महायुद्धात १२ फेब्रुवारी १९४४ रोजी ही घटना घडली होती.

भारतीय नौदल पाणबुडीच्या अवशेषांना बाहेर काढणार नाही
विझाग समुद्रकिनारी या पाणबुडीचे अवशेष सापडले. पाकिस्तानच्या पीएनएस गाझी या पाणबुडीचे अवशेष मिळाल्यानंतर भारतीय नौदल कर्मचाऱ्याने याबाबत अधिक माहिती दिली आहे. भारतीय नौदल मात्र या अवशेषांना हात लावणार नाही. कारण जलसमाधी मिळालेल्या जहाजाला युद्धादरम्यान मृत्यू झालेल्या सैनिकांचे अंतिम विश्रांतीस्थान मानले जाते. त्यामुळे आम्ही त्या पाणबुडीच्या अवशेषांना हात लावणार नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

 

Exit mobile version