पंतप्रधान मोदींनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंची घेतली भेट !

पंतप्रधानांना भेट म्हणून हॉकी संघाने स्वाक्षरी केलेली दिली 'जर्सी'

पंतप्रधान मोदींनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंची घेतली भेट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना संबोधित केले. पंतप्रधान मोदी पदक विजेत्या खेळाडूंना एक एक करून भेटले. पंतप्रधानांनी कांस्य पदक विजेती हॉकी टीम, नेमबाज मनू भाकर, कुस्तीपटू अमन सेहरावत, स्वप्नील कुसळे आणि सरबज्योत सिंग यांची भेट घेतली. यावेळी भारतीय पुरुष हॉकी संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट म्हणून संघाची स्वाक्षरी केलेली जर्सी दिली. दरम्यान, भारताने यावेळी ऑलिम्पिकमध्ये ६ पदके जिंकली आहेत.

स्टार खेळाडू नीरज चोप्रा मात्र पंतप्रधानांच्या या भेटीपासून मुकला. कारण अद्याप तो पॅरिस ऑलिम्पिकमधून मायदेशी परतला नाही. नीरज उपचारासाठी जर्मनीला गेला आहे. दुसरीकडे, बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूही वैयक्तिक कारणांमुळे भेटायला येऊ शकली नाही. २ ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या सिंधूला पॅरिस ऑलम्पिकमधून रिकाम्या हाती परतावे लागले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा केली. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले आणि सांगितले की, २०३६ चे ऑलिम्पिक भारतीय भूमीवर व्हावे यासाठी पूर्ण तयारी केली जात आहे. ते म्हणाले, “मित्रांनो, भारताचे स्वप्न आहे की २०३६ मध्ये होणारे ऑलिम्पिक हे भारताच्या भूमीवर व्हावे. त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत, पुढे जात आहोत. तसेच काही दिवसांत आमचे पॅरा-ॲथलीट पॅरालिम्पिकसाठी पॅरिसला जाणार आहेत, मी त्यांनाही शुभेच्छा देतो,असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

हे ही वाचा :

पोलिसांच्या नाकाबंदीत २ कोटींचा ड्रग्स साठा जप्त, एकाला अटक

मुंब्र्यात आला टिपू सुलतान; तिरंगा रॅलीत झळकले फोटो !

पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला आरोपी सापडला राजस्थानात

अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे दोन डबे झाले वेगळे!

 

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या ऑलिम्पिक विजेत्यांचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आमच्यासोबत तिरंग्याच्या झेंड्याखाली ते तरुण बसले आहेत ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा फडकवला आहे. १४० कोटी देशवासियांच्या वतीने मी माझ्या देशाच्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतो. नवी स्वप्ने, नवे संकल्प आणि प्रयत्नांसह नव्या ध्येयाकडे वाटचाल करू.

Exit mobile version