जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये ‘गुलाबी मतदान केंद्रां’ची चर्चा!

पूंछ, रियासी, नौशेरासह इतर जिल्ह्यांमध्ये गुलाबी मतदान केंद्रांची स्थापना

जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये ‘गुलाबी मतदान केंद्रां’ची चर्चा!

जम्मू- काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले होते आणि चांगल्या टक्क्यांनी मतदान पार पडले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी उच्चांक गाठेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच जम्मू- काश्मीरमध्ये चर्चा आहे ती गुलाबी मतदान केंद्रांची. निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक महिलांचा सहभाग असावा यासाठी ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे.

बुधवारी विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडत असून जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुलाबी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच रियासी आणि नौशेरासह जम्मू- काश्मीरच्या इतर जिल्ह्यांमध्येही गुलाबी मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे हे अनोखे मतदान केंद्र संपूर्णपणे महिलांनी व्यवस्थापित केले आहे. या गुलाबी मतदान केंद्राचे उद्दिष्ट आहे ते म्हणजे मतदारांसाठी स्वागतार्ह वातावरण निर्माण करणे आणि निवडणूक प्रक्रियेत महिलांच्या अधिकाधिक सहभागाला प्रोत्साहन देणे आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनीही या महिला-केंद्रित दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या प्रदेशातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी डिझाइन केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जम्मू आणि काश्मीरमधील मतदानाच्या पहिल्या टप्प्यात एकूण ११,७६,४४१ पुरुष आणि ११,५१,०४२ महिलांनी मतदान केले. १८ सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या २४ मतदारसंघांपैकी जम्मू- काश्मीरमधील सहा जिल्ह्यांमध्ये महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त मतदान केले. दुसऱ्या टप्प्यात सहा जिल्ह्यांतील २६ मतदारसंघातील २५ लाखांहून अधिक पात्र मतदार २३९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

हे ही वाचा:

जम्मू- काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान; २३९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव

‘धर्मनिरपेक्षता ही युरोपियन संकल्पना, भारतात याची गरज नाही’

‘विनेश फोगटने रडगाणे सांगण्याऐवजी माफी मागायला हवी होती’

जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका तब्बल १० वर्षांनी आणि कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच होत आहेत. चार महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठीही शांततेत मतदान होण्याची अपेक्षा आहे. यासाठी सुरक्षा दल सज्ज असून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

Exit mobile version