नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाकडून ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा गौरव

मनू भाकर, सरबज्योत सिंग आणि स्वप्नील कुसळे यांना रोख बक्षीस जाहीर

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाकडून ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा गौरव

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा नुकतीच पार पडली आणि या स्पर्धेत भारताने सहा पदकांची कमाई केली. यातील सर्वाधिक तीन पदके नेमबाजांनी मिळवून दिली आहेत. याचबरोबर आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांनी केलेली ही सर्वोत्तम कामगिरीही ठरली. या स्पर्धेतील यशानंतर सर्वच खेळाडूंचे देशभरात कौतुक होत असताना नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (NRAI) नेमबाजांचे कौतुक करत त्यांचा सत्कारही केला आहे. तसेच पदकं मिळवून आणणाऱ्या तीन खेळाडूंना रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचा गुणगौरव करण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित केला होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकर, सरबज्योत सिंग आणि स्वप्नील कुसळे यांनी नेमबाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पदके मिळवली. त्यांनी तीन कांस्य पदके भारताच्या खात्यात मिळवली. नेमबाजीमध्ये भारतासाठी आत्तापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

भारतासाठी दोन कांस्यपदके जिंकून नेमबाजीमध्ये विक्रम रचणाऱ्या मनू भाकर हिला ४५ लाख रुपये, ५० मीटर एअर रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या स्वप्नील कुसळेला ३० लाख रुपये, तर मनू भाकर सोबत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र गटात भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या सरबजोत सिंगला १५ लाख रुपये बक्षीस NRAI कडून जाहीर करण्यात आले. या सत्कार समारंभाला पॅरिस ऑलिम्पिकमधील संपूर्ण नेमबाजी पथक उपस्थित होते. उच्च कार्यप्रदर्शन संचालक डॉ. पिएर बुशॉम, परदेशी रायफल प्रशिक्षक थॉमस फारनिक, विदेशी पिस्तूल प्रशिक्षक मुंखब्यार दोर्जसुरेन, राष्ट्रीय १० मीटर पिस्तूल प्रशिक्षक मीसमरेश जंग आणि राष्ट्रीय ५० मीटर रायफल प्रशिक्षक मनोज कुमार यांच्यासह सहाय्यक कर्मचारी देखील उपस्थित होते. त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.

हे ही वाचा :

२२ जणांसह रशियन हेलिकॉप्टर बेपत्ता !

चंपाई सोरेन यांच्यानंतर लोबिन हेमब्रमही भाजपमध्ये दाखल !

पत्राचाळ प्रकरण: फडणवीसांचे नाव घेण्यासाठी दिली होती धमकी

राहुल, अखिलेश आणि तेजस्वी यांचे सरकार बनले तर भारताचा पाकिस्तान-बांगलादेश होईल !

NRAIचे प्रमुख कालिकेश सिंग देव म्हणाले की, “आमचे नेमबाज, प्रशिक्षक आणि संपूर्ण सहकारी कर्मचाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. या खेळात ते अग्रेसर आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे ही साधी कामगिरी नसून हे खेळाडू त्यांना मिळणाऱ्या सर्व प्रशंसा आणि पुरस्कारांना पात्र आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या कामगिरीमुळे संपूर्ण भारतातील नेमबाजांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Exit mobile version