जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. या हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांसह २७ जणांचा मृत्यू झाला. हल्लेखोर आणि पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरावरून केली जात आहे. हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुंबांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. याच दरम्यान, पिडीत कुटुंबाना मदतीचा हात म्हणून राष्ट्रीय शेअर बाजाराकडून (एनएसई) एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचे (एनएसई) प्रमुख आशिषकुमार चौहान यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आणि मृतांच्या नातेवाईकांना एक कोटी रुपयांची मदत करण्याचे वचन दिले.
आशिषकुमार चौहान यांनी ट्वीटकरत ही माहिती दिली. एनएसईचे प्रमुख आशिषकुमार चौहान ट्वीटकरत म्हणाले, २२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमध्ये झालेल्या दुःखद दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे, ज्यामध्ये २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबांसोबत एकता दर्शवत, एनएसईने पीडितांच्या जवळच्या नातेवाईकांना एक कोटी रुपयांची मदत देण्याचे वचन दिले आहे, असे आशिषकुमार चौहान यांनी म्हटले.
दरम्यान, जम्मू-काश्मीर सरकारकडून पिडीत कुटुंबाना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जण होते. राज्यसरकारने देखील मदतीचा हात पुढे करत पिडीत कुटुंबाना पाच लाख रुपयांची मदत करणार असल्याचे घोषित केले. तसेच पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेला काश्मिरी युवक सय्यद आदिल हुसैन शाह यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदेकडून मदत करण्यात आली आहे.
माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे.
We are deeply saddened by the tragic terrorist attack in Kashmir on April 22,2025 where 26 people lost their lives. In a humble gesture of support, NSE pledges Rs 1 crore to the next of kin of the victims, standing in solidarity with their families during this difficult time.…
— Ashish Chauhan (@ashishchauhan) April 24, 2025