‘भाजपवर शंका उपस्थित करण्याचा प्रश्नच नाही’

पंतप्रधान मोदी राज्यघटनेला नतमस्तक झाल्यानंतर स्टॅलिन यांच्या टीकेवर अण्णामलाई यांची प्रतिक्रिया

‘भाजपवर शंका उपस्थित करण्याचा प्रश्नच नाही’

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया गटाच्या ‘नैतिक विजया’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यघटनेपुढे नतमस्तक होण्यास प्रवृत्त केल्याचा दावा केल्यानंतर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि फायरब्रँड नेते के अण्णामलाई यांनी रविवारी सडेतोड प्रत्युत्तर दिले. ढोंगीपणा करणारा आणि राज्यघटनेची संपूर्णपणे अवहेलना करणाऱ्या द्रमुकला राज्यघटनेच्या आदराबाबत भाजप आणि पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्याचे कोणतेही नैतिक कारण नाही, असे अण्णामलाई यांनी ठणकावले.

द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडिया गटाने शनिवारी कोईम्बतूर येथे ताकद दाखवून भव्य विजयी फेरी काढल्यानंतर तमिळनाडूच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कोईम्बतूरमधून उभ्या राहिलेल्या अण्णामलाई यांचा पराभव द्रमुकच्या गणपती राजकुमार यांनी केला. या विजयी सभेनंतर त्यांनी ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली. ‘काल अशाच एका सेलिब्रेशनमध्ये, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी इंडिया गटातील इतर पक्षांप्रमाणेच भाजपवर ‘नैतिक विजय’ असा दावा केला.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सध्या त्यांचा ‘नैतिक विजय’ झाल्याचे मिरवत आहेत. मुख्यमंत्रिपदी असताना सोशल मीडिया पोस्टसाठी एकाला रात्री अटक करून राज्यघटनेची अवहेलना करणारे, गुन्हेगारांना रस्त्यावर फिरू देणारे, केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या कार्यक्रमात दगडफेक करायला लावणारे स्टॅलिन हे आज आपल्या राज्यघटनेला गंभीर धोका देणाऱ्या पक्षाशी युती करत आहे, असा मुख्यमंत्री आपल्या राज्यघटनेवर व्याख्यान देणारा शेवटचा माणूस असावा,’ असा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान याहीआधी राज्यघटनेपुढे नतमस्तक झाले आहेत, याची आठवण त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगांकडे लक्ष वेधून करून दिली. ‘आमच्या माननीय पंतप्रधानांनी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून राज्यघटनेचा सर्वोच्च आदर दाखवला आहे. त्यामुळे पंतप्रधानांना आता राज्यघटनेची आठवण झाली, हा मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा दावा खोटा आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

९०हून अधिक देशांची युक्रेनमधील शांततेसाठी चर्चा!

प. बंगालमध्ये मालगाडीची कांचनगंगा एक्स्प्रेसला धडक; चार जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

गटबाजीमुळे पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेतून बाहेर?

इंडिया गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यघटनेपुढे नतमस्तक केले, हा स्टॅलिन यांचा दावाही अण्णामलाई यांनी खोडून काढला. ते म्हणाले, ‘तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना मोदींचे जीवन आणि भारतीय राज्यघटनेबद्दल त्यांना असलेल्या आदराची आठवण करून देणे हे माझे कर्तव्य आहे. इंडिया गट आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यघटनेला कागदाचा तुकडा मानला आहे. ते त्यांची गरज भागवण्यासाठी कसेही पायदळी तुडवू शकतात.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांना आठवण करून देण्याची गरज आहे की, इंडिया गट देशभरातील संधीसाधू, घराणेशाही आणि भ्रष्टांचा समूह आहे, ज्यांनी निवडणूक लढवली आणि तरीही या निवडणुकीत ते भाजपने जिंकलेल्या जागाही मिळवू शकले नाहीत,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. दुसरीकडे, द्रमुकचे मुख्यमंत्री स्टॅलिन ज्यांनी इंडिया गटाचे नेतृत्व करत राज्यात ३९ जागा मिळवून मोठा विजय संपादन केला. ‘हा इंडिया गटाचा ‘नैतिक विजय’आहे. राज्यघटना बदलण्यासाठी आतूर असलेल्या सरकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या पवित्र दस्तावेजापुढे नतमस्तक होण्यास भाग पाडले,’ असा दावा स्टॅलिन यांनी केला होता.

Exit mobile version