राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या श्रेणीतून इंदिरा गांधी, नर्गिस दत्त यांची नावे वगळली

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी केले बदल

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या श्रेणीतून इंदिरा गांधी, नर्गिस दत्त यांची नावे वगळली

चित्रपटसृष्टीसाठी ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ हा मानाचा चित्रपट पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारांच्या बाबतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. या पुरस्कारांच्या श्रेणीतला एक पुरस्कार इंदिरा गांधी यांच्या नावे तर एक पुरस्कार नर्गिस दत्त यांच्या नावे देण्यात येतो. आता पुरस्कारांच्या श्रेणीत बदल करण्यात आला असून इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांची नावं या श्रेणीतून वगळण्यात आली आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी हे बदल करण्यात आले आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांमध्ये पुरस्कारांची रक्कम वाढवण्यात आली आहे. तर, श्रेणींमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने नेमलेल्या समितीने कोरोना काळात ही चर्चा केली होती आणि आता एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारने नेमलेल्या समितीने केलेल्या बदलांनुसार, ‘इंदिरा गांधी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक’ या पुरस्काराचे नाव ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक’ असे करण्यात आले आहे. तसेच, या पुरस्काराचे रोख पारितोषिक पूर्वी चित्रपटनिर्माता आणि दिग्दर्शकाला विभागून दिले जायचे. नव्या बदलानुसार, ते आता केवळ दिग्दर्शकालाच मिळेल. तर, ‘नरगिस दत्त सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मता चित्रपटा’चे नाव ‘राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट’ असे बदलण्यात आले आहे. या श्रेणीत सामाजिक आणि पर्यावरण संवर्धनावरील चित्रपटांचाही समावेश करण्यात आला आहे. तर, भारतीय चित्रपटांमधील अतुलनीय योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या रोख पारितोषिकाची रक्कम १० लाखांवरून १५ लाख करण्यात आली आहे. याशिवाय विविध श्रेणीतील सुवर्ण कमळ पुरस्कारांची बक्षीस रक्कम तीन लाख रुपये आणि रौप्य कमळ विजेत्यांसाठी दोन लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी वेगवेगळ्या श्रेणीनुसार पुरस्कारांची रक्कम वेगवेगळी होती. इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांची नावं वगळण्याबाबत नेमके कारण काय याबाबत कोणतेही स्पष्टीकरण समोर आलेले नाही.

हे ही वाचा:

मॉरिस युट्युबवरून घेत होता बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण

हमासच्या ताब्यातून दोन इस्रायली नागरिकांची सुटका!

 शेतकरी आंदोलनात दिसला खलिस्तानी ध्वज! 

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय युएई दौऱ्यावर रवाना!

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी खात्याच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर होत्या. तर, निर्माते प्रियदर्शन, विपुल शाह, सीबीएफसीचे प्रमुख प्रसून जोशी, सिनेमॅटोग्राफर एस. नल्लामुथू आणि माहिती प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव पृथूल कुमार आदींचा समावेश होता.

Exit mobile version