मध्य प्रदेशातील “मोस्ट वॉन्टेड’ लंगूर माकडाला चार तासांच्या शोधमोहिमेनंतर पकडले

माकडाने आठ मुलांसह सुमारे डझनभर लोकांवर हल्ले केले आहेत.

मध्य प्रदेशातील “मोस्ट वॉन्टेड’ लंगूर माकडाला चार तासांच्या शोधमोहिमेनंतर पकडले

मध्य प्रदेशातील राजगढमधील या माकडाने दहशत माजवली होती. ते अचानक कुठून तरी यायचे, लोकांवर हल्ला करायचे आणि मध्येच गायब व्हायचे. त्याच्या डोक्यावर तब्बल २१ हजारांचे इनाम होते. मात्र तरीही त्याचा पत्ता लागत नव्हता. तब्बल २० दिवस गावकऱ्यांनी दहशतीखाली घालवल्यानंतर अखेर हे माकड जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्याला पकडण्यासाठी तब्बल चार तास शोधमोहीम सुरू होती.

 

हे माकड कोणाच्या छतावर अथवा खिडकीच्या चौकटीवर बसून असे. मात्र ते समोरच्यावर कधी हल्ला करेल, याची शाश्वती नव्हती. त्यामुळे लोक या माकडापासून सावधच राहात. आतापर्यंत माकडाने आठ मुलांसह सुमारे डझनभर लोकांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे स्थानिकही घराबाहेर पडण्यापूर्वी लाठ्या आणि बंदुकांचा वापर करत असत. मात्र राजगडमध्ये जेव्हा या माकडाने एक वकील आणि एका तरुणीवर बाजारात हल्ला केला, तेव्हा मात्र लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला. यापूर्वीही अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे या माकडाच्या तक्रारी गेल्या होत्या. मात्र बाजारातील या घटनेने जिल्हा प्रशासनाला ठोस कारवाई करण्यास भाग पाडले.

 

या माकडाला पकडण्यासाठी बुधवारी उज्जैन येथून बचाव पथकाला बोलावण्यात आले. त्याला प्रथम भूल देऊन शांत करण्यात आले. महापालिका आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाने त्याला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी ते त्यांना चकवा देत असे. या माकडाला पकडण्यासाठी ड्रोन कॅमेरे तैनात करण्यात आले होते. त्याद्वारे त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत होती. अधिकार्‍यांनी शाळेत माकडाचा माग काढल्यानंतर पथकाने धाव घेतली आणि चार तास चाललेल्या या मोहिमेनंतर त्याला शांत करण्यात यश आले.

हे ही वाचा:

मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट करणार, मुंबई पोलिसांना धमकी

पाकिस्तानने पेरलेले दोन डॉक्टर अखेर बडतर्फ; काश्मिरात दोन महिलांचा खोटा शवविच्छेदन अहवाल दिला

अग्रलेखाची उंची आणि वैचारिक खुजेपणा

‘कॅस्ट्रोफिक इम्पोशन’मुळे पाणबुडीचा अपघात

अधिकारी या माकडाला घेऊन जात असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी ‘जय श्री राम’ आणि ‘बजरंग बली की जय’ असा नारा दिला. या माकडाला नंतर देवास येथील घनदाट जंगलात सोडण्यात येणार आहे.
राजगढ नगरपालिकेचे अध्यक्ष विनोद साहू यांनी जो कोणी माकडाला पकडेल त्याला २१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे हे माकड पकडणऱ्या वन विभागाच्या पथकाचा गौरव करून त्यांना रोख बक्षीस दिले जाणार आहे, असे साहू यांनी सांगितले.

Exit mobile version