वादविवादानंतर कबड्डीत भारताने केली इराणची सोनेरी पकड

२८-२८ अशी बरोबरी झालेली असताना भारताच्या चढाईवरून झाला संघर्ष

वादविवादानंतर कबड्डीत भारताने केली इराणची सोनेरी पकड

आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने बाजी मारली असून भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदकाची भर पडली आहे. भारतीय संघाने अंतिम फेरीत इराणचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले आहे. भारताने अंतिम सामन्यात इराणचा ३३ – २९ असा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यापूर्वी महिला कबड्डी संघाने तैवान संघाला हरवत सुवर्णपदक जिंकलं होते. त्यानंतर आता पुरूष संघानेही चमकदार कामगिरी केली आहे.

भारत विरुद्ध इराण या अंतिम सामन्यात काहीसा वाद झाला त्यामुळे सामन्याला देखील विलंब झाला. पण अखेर निर्णय हा भारताच्या बाजूने देण्यात आला. तासाभराच्या वादानंतर शेवटी खेळ पुन्हा सुरु करण्यात आला आणि भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक आले.

 

असा झाला होता वाद!

भारत आणि इराणमध्ये २८-२८ अशी बरोबरी झालेली असताना हा वाद उफाळला. सामना संपण्यासाठी केवळ एक मिनिटाचा अवधी राहिलेला असताना भारताचा कर्णधार पवन सेहरावतने चढाई केली. त्यात भारताला एक गुण घेणे आवश्यक होते. त्यावेळी सेहरावत लॉबीत गेल्याचे म्हटले गेले. पण त्याचवेळी इराणचे चार खेळाडूही लॉबीत गेले होते. तर इराणचा पाचवा खेळाडू मात्र कोर्टच्या मर्यादेच्या पलिकडे गेला. त्यानंतर इराकी पंच अलघली बासिम मेजबेल यांनी दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल केला. त्यातून सामन्यात वाद निर्माण झाला. कबड्डी नियमांवरून तो वाद उत्पन्न झाला.

 

 

आंतरराष्ट्रीय कबड्डी संघटनेच्या जुन्या नियमांनुसार जर चढाईपटू लॉबीत गेला तर तो बाद असतो. त्यानुसार इराणचा खेळाडू तर कोर्टच्या बाहेर गेला होता आणि चार खेळाडू लॉबीत गेले होते. पण पंचांनी दोन्ही संघांना एकेक गुण दिल्यामुळे भारताने त्यावर आक्षेप घेतला. भारताला चार गुण मिळायला हवेत अशी भारताची मागणी होती. त्यातून इराणी खेळाडूही आक्रमक झाले. त्यातून सामना आणखी लांबला. भारतीय कबड्डी फेडरेशनचा पदाधिकारीही कोर्टवर उतरला तर तिथे इराणच्या पदाधिकाऱ्यानेही आक्षेप नोंदविला. पण शेवटी पंचांनी भारताला तीन गुण दिले तर त्यामुळे भारत ३१-२९ असा आघाडीवर होता. तेव्हा इराणचा केवळ एक खेळाडू राहिला होता. अखेर भारताने ३३-२९ अशी लढत जिंकली.

 

भारताची सुरूवात थोडी डगमगत झाली होती. इराणच्या संघाने सुरूवातील ३ – १ ने आघाडी मिळवली होती. काही वेळातच भारतीय संघाने पुनरागमन करत ५ – ५ अशी अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर इराणने पुन्हा भारतावर आघाडी घेतली होती. मात्र, नंतर भारतीय खेळाडूंनी कमबॅक करत त्यांची आघाडी कायम ठेवली. दरम्यान, सामन्यामध्ये एका पॉइंटवरून बराच राडा झाला. जवळपास ३० मिनिटे खेळ थांबवण्यात आला होता. त्यापूर्वी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर भारताने कबड्डीमध्ये उपांत्य फेरीत विजय मिळवला होता.

हे ही वाचा:

हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्याला इस्रायलकडून एअर स्ट्राईकने उत्तर

ऑनलाईन गेमिंग ऍप प्रकरणी बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा

एनएसएस स्वयंसेवकांनी लावलेली झाडे का उपटून टाकण्यात आली?

विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलतोय!

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अव्वल कामगिरी करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारताने १०० पदकांचा टप्पा गाठला आहे. अबकी बार १०० पार असं लक्ष्य घेऊन यंदा भारतीय खेळाडू आशियाई स्पर्धेमध्ये उतरले होते. हे लक्ष्य भारताने गाठलं आहे.

Exit mobile version