सोंगाड्या, सवाल माझा ऐकामधील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन

वयाच्या ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, दोन बायका फजिती ऐका, चांडाळ चौकडी, असला नवरा नको गं बाई, सोंगाड्या या चित्रपटातून केले होते काम

सोंगाड्या, सवाल माझा ऐकामधील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे आज (सोमवारी) निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शांता तांबे यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तब्बल सात दशके त्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले. त्यानंतर उतरत्या वयामुळे त्या अभिनय क्षेत्रापासून काहीशा दूर झाल्या. त्या कोल्हापूरातील त्यांच्या घरी राहत होत्या. त्या अलीकडेच तुझ्यात जीव रंगला या मालिकेत दिसल्या. या मालिकेत त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. शांता तांबे यांनी नाटकामध्ये काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. देश बंधू संगीत मंडळी यांच्या नाटकात त्यांनी काम केले होते.

आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने आदी ख्यातनाम दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले. मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, मोलकरीण, बाई मोठी भाग्याची, मर्दानी, दोन बायका फजिती ऐका, चांडाळ चौकडी, असला नवरा नको गं बाई, सोंगाड्या, चंदनाची चोळी अशा अनेक चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने चित्रपटांमध्ये काम करण्याचे ठरवले होते, असे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते.

हे ही वाचा:

मनीषा कायंदेंनी दाखवले सुषमा अंधारेंकडे बोट?

दिल्लीत कॉलेजच्या आवाराबाहेर विद्यार्थ्याची हत्या

आम्हाला धमकावलेले नाही… अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी दावे फेटाळले

गोरखपूरच्या १०० वर्षे जुन्या गीता प्रेसला ‘गांधी शांतता पुरस्कार’

एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होते की, मी जेव्हा अभिनयक्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा आता जसे लोक अभिनय करायचा आहे, अशा उद्देशानं या क्षेत्रात येतात तशी मी या क्षेत्रात आले नव्हते. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने मी या क्षेत्रात आले. पण अभिनय क्षेत्रात आल्यानंतर मी या क्षेत्रात प्रगती केली. मला चांगले दिग्दर्शक मिळाले. देश बंधू संगीत मंडळी यांच्या नाटकामध्ये मी काम केलं. चार महिने मी त्यांच्यासोबत काम केलं. तिथेही मला लोक चांगले मिळाले. त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.

सध्याच्या चित्रपटांबाबत शांता तांबे म्हणाल्या होत्या की, आताचे सर्व चित्रपट कॉमिक आहेत. ते चित्रपट सर्व चांगले आहे. त्या काळातील कथानक वेगळे आताचे वेगळे आहे. दिग्दर्शकही वेगळे असतात. त्यांचे काम देखील वेगळे असते. आम्हाला त्या काळी चांगले दिग्दर्शक मिळाले. त्यामुळे मला अभिनय देखील चांगला करता आला.

Exit mobile version