विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्राचा वाटा मोठा!

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे गौरवोद्गार

विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्राचा वाटा मोठा!

जागतिक उद्योगक्षेत्राबरोबरच, जागतिक नेत्यांचाही भारता विषयीचा विश्वास वाढल्यामुळे भारताची प्रतिमा आणि प्रतिष्ठा स्पष्ट झाली असून जागतिक उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे, यापेक्षा अन्य पुराव्याची गरज नाही. जेथे राज्य, केंद्र सरकार एकत्र काम करतात, तेथे उद्योगांची सहाजिकच पहिली पसंती असते. सुसज्ज सुविधांसोबतच महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीस सर्वाधिक योग्य राज्य असल्याची जागतिक उद्योगांची भावना असल्यामुळे विकसित भारत संकल्पनेच्या पूर्ततेमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी काढले. रविवारी (२७ ऑक्टोबर) मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री जयशंकर बोलत होते. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार, सरचिटणीस संजय उपाध्याय उपस्थित होते.

मंत्री जयशंकर यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वात विकसित महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीसाठी समर्पितपणे व वेगवान काम सुरू असून त्यासाठी महाराष्ट्राचा विकास वेगवान असायलाच हवा. स्वातंत्र्यानंतर उद्योग, तंत्रज्ञान, विमानतळ, रेल्वे वाहतूक, बुद्धिमत्ता, भौगोलिक सुविधा यांमध्ये महाराष्ट्र कायम आघाडीवर राहिला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात झालेले काम महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार सर्वसमान्यांपर्यंत पोहोचवत आहे. गेल्या काही महिन्यांत विदेशी गुंतवणूक, उत्पादन, निर्यातवाढ, यांबाबत सरकारने मोठे निर्णय घेतले असून त्यामुळे देशातील गुंतवणूक, पायाभूत सुविधांचा विकास, बंदरांचा विकास तसेच रेल्वे, रस्ते वाहतुकीच्या सुविधा बळकट झाल्या आहेत.

कौशल्य, शिक्षण, प्रशिक्षण यांच्या आधारे तरुण पिढीला रोजगारक्षम बनविण्यावर भर दिला जात असल्यामुळे आता केवळ देशातच नव्हे, तर ‘ग्लोबल वर्कप्लेस’ म्हणजे, अनेक अन्य देशांतही आमचे रोजगारक्षम तरूण नोकऱ्या मिळवू लागले आहेत. पंतप्रधान मोदी स्वतः काही आठवड्यांपूर्वी सिंगापूरच्या जी-७ संमेलनात सहभागी झाले होते. संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिकेसारख्या देशांच्या दौऱ्यात त्यांनी तेथील उद्योगपती, कंपन्यांसोबत चर्चा केली. आता रोजगार, गुंतवणूक, उत्पादन या क्षेत्रांत देशाने भक्कमपणे पाय रोवले असून यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता केली जात आहे. शेजारी राष्ट्रांतील घटनांबाबतही आपण योग्य प्रकारे सतर्क असून जगातील तणावपूर्ण परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांची भूमिका महत्वाची ठरत असल्याचे मंत्री जयशंकर यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

‘पहिल्यांदाच डिजिटल अटकेचा उल्लेख, फसवणूक टाळण्यासाठी पंतप्रधानांनी सांगितले तीन उपाय’

‘देवेंद्र फडणवीस राजकीय विरोधक, पण वैयक्तिक शत्रू नाहीत’

वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर ठोकला दावा, शेतकरी म्हणाले, आम्ही जायचे कुठे?

पंजाबच्या रेचेल गुप्ताने ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४’ चा जिंकला ‘ताज’

गुंतवणुक आकृष्ट करण्यासाठी राज्यांनी स्पर्धा करावी, ती देशहिताचीच असते. पण महाराष्ट्र हे सर्वाधिक उद्योगप्रधान राज्य असून उद्योगांची महाराष्ट्रास पसंती आहे. महाराष्ट्रातील बंदरे ही सर्वाधिक जागतिक सुविधायुक्त आहेत. रस्ते, रेल्वेचे जाळे, महाराष्ट्राला महत्वाची भौगोलिक अनुकूलता आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आदर्श राज्य आहे. जर्मनीतील अनेक उद्योगांनी महाराष्ट्राला पसंती दिली असल्याचे मंत्री जयशंकर यांनी सांगितले.

गेल्या दशकभरात देशाच्या सीमाभागात मोठे परिवर्तन झाले असून सीमेवर कुंपण बांधण्यात प्रगती झाल्याने पूर्वी एवढी घुसखोरी आता होत नाही, असा दावाही त्यांनी केला. मध्यंतरीच्या बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे सीमेपलीकडून काही प्रयत्न झाले, पण कारवाई करावी लागली. मोदी सरकार देशाच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी जरूर प्रयत्न करत राहील. जेथे कुंपण घालणे गरजेचे आहे, तेथे कुंपणही घातले जाईल, असे मंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केले. बांगलादेश, म्यानम्यारमधून काहीजण शरणार्थी बनून घुसखोरी करू पाहत असल्याचे स्पष्ट झाल्याने सीमासुरक्षेचा फेरआढावा घेतला जात असून आम्ही सीमाभाग मोकळा राहू देणार नाही. कोणीही कसेही घुसावे ही २०१४ पूर्वीची स्थिती आता राहिलेली नसल्याचे मंत्री जयशंकर यांनी म्हटले.

Exit mobile version