हैदराबादमध्ये अपराजित ओवैसी यांना कडवे आव्हान माधवी लता यांचे

माधवी लता यांचा आरोप आहे की ओवैसी बोगस मतांनी विजयी ठरत आले आहेत.

हैदराबादमध्ये अपराजित ओवैसी यांना कडवे आव्हान माधवी लता यांचे

चारवेळा खासदार झालेले आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन (एआयएमआयएम)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा हैदराबाद मतदारसंघात कधीच पराभव झालेला नाही. समोरच्या पक्षाने कधीच येथे दमदार उमेदवार उतरवला नाही. त्यामुळे मतांचे अंतरही लाखोंच्या घरात होते. त्यामुळेच ते गेली २० वर्षे अपराजित होते. त्यांचे वडीलही २० वर्षे येथून जिंकत आले आहेत. मात्र यंदा त्यांची थेट लढत भाजपच्या डॉ. माधवी लता यांच्याशी आहे. त्या राजकारणात नवीन असल्या तरी वक्तृत्वात कुशल आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे कडवे आव्हान उभे ठाकले आहे.

हैदराबादमधील सात विधानसभा जागांपैकी सहा जागांवर ओवैसी पक्षाचे आमदार आहेत. त्यांचा भाऊ अकबरुद्दीन ओवैसी इथल्यास चंद्रयानगुट्टाचे आमदार आहेत. भाजपने केवळ गोशामहलमधून विजय मिळवला आहे. येथील आमदार टी. राजा सिंह यांनी लोकसभेचे तिकीट मागितले होते, मात्र भाजपने डॉ. माधवी लता यांना तिकीट दिले. त्यामुळे ते नाराज आहेत.

हैदराबादच्या ओवैसी कुटुंबाचा तीन पिढ्यांपासून येथे संबंध आहे. ओवैसी यांचे आजोबा अब्दुल वाहिद ओवैसी यांनी सन १९५७मध्ये हैदराबाद नगरपालिकेतून निवडणूक लढवली होती. ओवैसी यांचे वडील सुल्तान सलाहुद्दीन ओवैसी सन १९८० ते १९९९पर्यंत सलग सहावेळा खासदार म्हणून निवडून आले. ओवैसी यांच्या वडिलांना सन १९९६मध्ये भाजपचे व्यंकय्या नायडू आणि सन १९९९मध्ये बी. बाल रेड्डी यांच्याकडून कडवे आव्हान मिळाले होते. सन २००८मध्ये हैदराबाद मतदारसंघाच्या सीमा बदलल्या आणि विकाराबाद आणि चेवल्ला विधानसभा मतदारसंघ या भागातून वेगळा झाला. त्यामुळे हैदराबाद हे जुन्या शहरापर्यंतच सीमित राहिले.

हे ही वाचा:

सलमान खान गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची तुरुंगातच आत्महत्या

‘न्यूजक्लिकच्या संस्थापकाकडून दहशतवादी गटांना आर्थिक मदत’

नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे लोकसभेच्या रिंगणात

राहुल गांधींच्या वक्तव्यावर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचा आक्षेप

ओवैसी हे गेल्या निवडणुकीत अडीच लाख मतांनी विजयी झाले होते. माधवी लता यांचा आरोप आहे की. ते बोगस मतांनी विजयी ठरत आले आहेत. यंदा हजारोंच्या संख्येने मतदारांची नावे यादीत नाहीत. तरीही ओवैसी यांच्या ताकदीचा विरोधी पक्षांना पुरता अंदाज आहे. म्हणूनच माधवी लता यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनीही रोड शो केला होता. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी येथे प्रबुद्ध संमेलन केले होते. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांसह अनेक नेत्यांचे कार्यक्रम ठरले आहेत.

या आव्हानांची पुरती जाणीव असलेल्या ओवैसी यांनीही मोठ्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. गल्लोगल्लीत प्रचारादरम्यान ‘बीफ शॉप जिंदाबाद’च्या घोषणाही दिल्या. त्यावर टीका झाली असता, ते ‘इडली शॉप जिंदाबाद’ही म्हणतात, असे त्यांनी सांगितले.

ओवैसी यांना भाजपची बी टीम संबोधणाऱ्या काँग्रेसने कधीच त्यांच्याविरोधात मजबूत उमेदवार उतरवा नाही. हीच परिस्थिती बीआरएसचीही आहे. असे म्हणतात की, ओवैसी उघडपणे काहीही सांगोत, मात्र तेलंगणात ज्यांचे सरकार असते, ते त्यांच्यासोबतच मिळून मिसळून राहतात. ते सुरुवातीला बीआरएसच्या जवळ होते, आता ते काँग्रेसच्या आहेत. माधवी लता यांच्या मते, काँग्रेसने जिल्हाध्यक्ष मो. वलीउल्लाह समीर यांना डमी उमेदवार म्हणून उभे केले आहे. बीआरएसचे जी. श्रीनिवास यादव हेदेखील नावाला उमेदवार आहेत.

Exit mobile version