शरद पवारांनी केली विचारवंत, पुरोगाम्यांची कोंडी

अदानी मुद्द्यावरून मुलाखतीत शरद पवारांनी व्यक्त केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात खळबळ

शरद पवारांनी केली विचारवंत, पुरोगाम्यांची कोंडी

सध्या देशभरात अदानी प्रकरणावरून विरोधकांना गदारोळ सुरू केलेला आहे. लोकसभा, राज्यसभेतही कामकाज याच मुद्द्यावर होऊ शकलेले नाही. अदानी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करा आणि चौकशी करा अशी मागणी सातत्याने काँग्रेस व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लावून धरली आहे. रोज त्यासंदर्भात काँग्रेसकडून ट्विट करणे, अदानींच्या २० हजार कोटींचे काय असा सवाल काँग्रेसकडून विचारला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एनडीटीव्हीला दिलेली मुलाखत चांगलीच गाजते आहे.

अदानींच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही. न्यायालयाच्या चौकशी समितीच्या माध्यमातूनही चौकशी करता येऊ शकते. शिवाय, अदानींना लक्ष्य करणाऱ्या हिंडेनबर्गची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी होती, अशी भूमिका शरद पवार यानी मांडली. त्यामुळे अर्थातच देशभरात खळबळ उडाली. कारण एरव्ही मोदी सरकारच्या विरोधात सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे काम शरद पवार देशपातळीवर करत असतात. अनेकवेळा दिल्लीतही त्यांच्या निवासस्थानी विरोधकांच्या बैठका झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत विरोधकांचा एककलमी कार्यक्रम असलेल्या अदानी चौकशीच्या मागणीवर बोळा फिरविण्याचे काम पवारांनी या मुलाखतीतून केले. त्यामुळे विरोधकांमध्ये नाराजी असली तरी ती नाराजी काही तीव्रपणे दिसलेली नाही.

काँग्रेसने ही पवारांची भूमिका असली तरी त्यामुळे विरोधकांमध्ये फूट पडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. इकडे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे प्रवक्ते संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून पवारांवर निशाणा साधण्यात आलेला नाही. उलट ती त्यांची भूमिका आहे पण काँग्रेसने संयुक्त संसदीय समितीचीच मागणी केली आहे, अशी सारवासारवीची भूमिका घेतली आहे. एकूणच विरोधी पक्ष संभ्रमात आहेत की करायचे तरी काय? शरद पवारांनीच अशी भूमिका घेतल्यामुळे सगळ्यांची कोंडी झाली आहे.

मात्र सगळ्यात जास्त कोंडी झाली आहे ती विचारवंत, पुरोगामी, साहित्यिक, लेखक यांची. तथाकथित पुरोगाम्यांना शरद पवारांनी तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिलेला आहे. कारण महाराष्ट्रातील पुरोगामी चेहरा म्हणजे शरद पवार. त्यांनी भूमिका घेतली की ती उचलून धरणे आणि त्या जोरावर महाराष्ट्रात चर्चा घडवून आणणे हा या पुरोगामी, विचारवंत, पत्रकार, लेखकांचा आवडता खेळ बनलेला आहे. त्या अर्थाने पवार हे त्यांचे आधारस्तंभ आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या साहित्य संमेलनात म्हणूनच शरद पवार कधी उद्घाटनाला तर कधी समारोपाला दिसतात. त्यामुळे या सगळ्या मंडळींचा पवारांवर जबरदस्त विश्वास आहे. मात्र आता शरद पवारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यांची तोंडे बंद झाली आहेत.

कारण २०१४पासून देशभरात कशी लोकशाही संपली आहे, लोकशाहीची कशी हत्या झाली आहे, नरेंद्र मोदी आल्यामुळे कसे देशातील वातावरण बिघडले आहे असा कंठशोष ही मंडळी करत आली आहेत. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जेवढी टीका वेगवेगळ्या अंगाने करता येईल तेवढी करण्याचा या मंडळींचा प्रयत्न असतो. नरेंद्र मोदींच्या बाजूने एखादा कौतुकाचा शब्दही ते काढणे उचित समजत नाहीत. तसा प्रयत्न अन्य कुणी केला की, त्याला काळ्या यादीत टाकले जाते, तो अंधभक्त, मोदीभक्त ठरतो. पण आता दस्तुरखुद्द शरद पवारांनीच अदानी प्रकरणात विरोधकांच्या विरोधातली भूमिका घेतल्यामुळे या विचारवंतांना काय करावे हे सुचेनासे झाले आहे.

बिथरलेले हे विचारवंत सोशल मीडियातून पवारांच्या या कृतीचा विरोध करताना दिसत आहेत. कुठे पवारांच्या संदर्भातील एखादा व्हीडिओ टाक, एखादे कार्टून टाक, एखादी पोस्ट टाकून पवारांच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त कर. त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात्मक पुस्तकातील अदानींवर लिहिलेले प्रकरण सोशल माध्यमांमध्ये शेअर कर असे प्रयत्न ही सगळी मंडळी करत आहेत. अदानींना पाठिंबा देताना क्रमाने नरेंद्र मोदींनाही समर्थन देणारी पवारांची ती मुलाखत या विचारवंतांना रुचलेली नाही. सर्वसामान्य माणसाला अंधभक्ताच्या कॅटेगरीत टाकता येते पण पवारांना तशी उपाधी कशी काय लावता येईल, या धर्मसंकटात हे सगळे विचारवंत सापडले आहेत. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून ही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागून प्रकरण संपवायला हवं होतं!

मंदिर वही बनायेंगेचा नारा सत्यात उतरतांना बघतोय

कर्नाटक स्पोर्टिंगने जिंकली पद्माकर तालीम शिल्ड

शेअर बाजारातल्याअव्वल १० पैकी ८ कंपन्यांच्या बाजार भांडवलात ८२,१६९ कोटी रुपयांनी वाढ

अर्थात, शरद पवारांना अशा नाराजीने फरक पडत नाही. त्यांनी जेव्हा मुलाखतीतून आपली भूमिका मांडली तेव्हा त्याच्या काय प्रतिक्रिया समाजात उमटतील याची पुरती कल्पना त्यांना आहे. विचारवंतही यामुळे बिथरतील हे त्यांना ठाऊक आहेच पण ते विचारवंत आपल्या विरोधात जाऊ शकत नाहीत हेदेखील ते पुरते ओळखून आहेत. काही काळ नाराजी व्यक्त करून नंतर कमरेत वाकून, हात जोडून ते आपल्या बाजूला उभे राहतील आणि तसे त्यांना राहावे लागेल हे पवारांना चांगले माहीत आहे. त्यामुळे विचारवंतांच्या नजरेतून तूर्तास पवार उतरले असले तरी पवारांना आपल्यापासून अलग करणे त्यांना परवडणारे नाही, याचेही त्यांना भान असेलच.

Exit mobile version