विराटने शतक ठोकले, पण दक्षिण आफ्रिकेचे शतकही नाही

भारताने ८३ धावांतच गुंडाळले, २४३ धावांनी विजय

विराटने शतक ठोकले, पण दक्षिण आफ्रिकेचे शतकही नाही

भारताने वर्ल्डकपमधील आपली यशस्वी घोडदौड आठव्या सामन्यातही कायम ठेवली. दक्षिण आफ्रिकेवर तब्बल २४३ धावांनी विजय मिळवत भारताने वर्ल्डकप विजेतेपदासाठीचा आपला दावा आणखी बळकट केला. भारताचा हा सलग आठवा विजय ठरला. भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. विराट कोहलीचे ४९वे वनडे शतक हे सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.

इडन गार्डन्सवरील या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३२६ धावा केल्या आणि त्याला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या ८३ धावांतच खुर्दा उडाला. रवींद्र जाडेजा भारताचा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५ बळी घेतले.
दक्षिण आफ्रिकेची सुरुवातच डळमळीत झाली. मोहम्मद सिराजने क्विन्टन डीकॉकला ५ धावांवर बाद केले, तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात ६ धावा जमा झाल्या होत्या. टेम्बा बावुमा आणि रॅसी ड्युसेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण रवींद्र जाडेजाने बावुमाला ११ धावांवर चकवले आणि दक्षिण आफ्रिकेची स्थिती २ बाद २२ अशी झाली. त्यानंतरचे षटक मोहम्मद शमीला देण्यात आले. त्याने ऐडन मॅकरमला ९ धावांवर झेलचीत केले. दक्षिण आफ्रिका ३ बाद ३५ अशी अडचणीत सापडली. ही घसरण थांबलीच नाही.

हे ही वाचा:

‘विराट’ वाढदिवस, सचिनच्या वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी

दोन फ्लॅट १५० खरेदीदारांना विकले, बेंगळुरूच्या बिल्डरला अटक!

इस्रायल-हमास वाद जुना आहे पण आता तो शिगेला पोचला!

गाझामध्ये युद्धबंदीसाठी अरब नेत्यांचा अमेरिकेवर दबाव!

अष्टपैलू जाडेजाने पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेला खिंडार पाडले. त्याने क्लासेनला अवघ्या १ धावेवर बाद केले. दक्षिण आफ्रिकेची स्थिती ४ बाद ४० अशी झाली. ड्युसेनला शमीने टिपले तेव्हा ४० धावांत दक्षिण आफ्रिकेचा संघ तंबूत परतला होता.. डेव्हीड मिलर आणि मार्को जॅन्सेन यांनी दक्षिण आफ्रिकेला ५० धावांचा टप्पा गाठून दिला. तेव्हा १५ षटके झाली होती. पण जाडेजाने मिलरचा अडथळा दूर केला आणि दक्षिण आफ्रिका ६ बाद ५९ अशा बिकट परिस्थितीत सापडली.

 

दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतासमोर अधिक दुबळा वाटू लागला. जाडेजाने केशव महाराजला बाद केले तेव्हा त्यांची स्थिती ७ बाद ६७ अशी होती. नंतर कुलदीपने जॅन्सेनला आणि जाडेजाने रबाडाला बाद करत दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला.
विराटने हा सामना गाजविला. त्याने वनडे कारकीर्दीतील आपले ४९वे शतक ठोकले. सचिन तेंडुलकरचा ४९ वनडे शतकांच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. विशेष म्हणजे आपल्या ३५ व्या वाढदिवशी त्याने ही कामगिरी केली. त्याने श्रेयस अय्यरसह १३४ धावांची भागीदारीही केली. विराटच्या या शतकी खेळीत षटकार मात्र नव्हता. १० चौकारांसह त्याने हे शतक पूर्ण केले.

 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पण उरलेल्या तीन जागांसाठी अद्याप बराच वाव आहे.

Exit mobile version