बांगलादेशातील हिंसाचारामुळे आयसीसी चिंतेत; महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे ठिकाण बदलणार?

बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळला असून पंतप्रधानांनी सोडला देश

बांगलादेशातील हिंसाचारामुळे आयसीसी चिंतेत; महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे ठिकाण बदलणार?

भारताचा शेजारी असलेला देश बांगलादेशमध्ये सध्या हिंसाचार उसळला असून सोमवार, ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला. अचानक झालेल्या या अंतर्गत कलहामुळे बांगलादेशमधील परिस्थिती चिंतेची बनली असून यामुळे आता इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल म्हणजेच आयसीसीचीही चिंता वाढली आहे. बांगलादेशात शेख हसीना सरकारच्या विरोधात अनेक दिवसांपासून निदर्शने होत होती, त्यानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडला. त्यामुळे अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या बांगलादेशातील सत्ता तेथील लष्कराने ताब्यात घेतली आहे. मात्र, तेथे दोन महिन्यांनंतर होणाऱ्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

बांगलादेशातील बिघडलेल्या परिस्थितीवर आयसीसी सतत लक्ष ठेवून आहे. “आयसीसी बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी), त्यांच्या सुरक्षा एजन्सी आणि स्वतःच्या सुरक्षा सल्लागारांशी सतत संपर्कात आहे आणि होत असणाऱ्या बदलांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे,” असे आयसीसी बोर्ड सदस्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सर्व खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही स्पर्धा सुरू होण्यासाठी अजून सात आठवडे बाकी आहेत, त्यामुळे स्पर्धा दुसऱ्याठिकाणी आयोजन करण्याबाबत आताचं कोणतेही विधान करणे खूप घाईचे ठरू शकते, असं म्हटलं आहे.

हे ही वाचा:

मूकबधिर तरुणांनीच केली मूकबधिर तरुणाची हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये

भारतीय महिला टेबल टेनिस संघाची कमाल, रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश !

गिरगावात भररस्त्यात पत्नीवर चाकूने वार करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

बांगलादेशातील सत्तापालटानंतर बीएसएफकडून सर्व सीमेवर ‘हाय अलर्ट’

बांगलादेशमधील परिस्थितीवर आयसीसी बारीक लक्ष ठेवून असून आयसीसीकडून स्पर्धेसाठी इतर ठिकाणांचा विचार केला जात असल्याचे बोलले जात आहे. आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप आयोजित करण्यासाठी बॅकअप म्हणून भारत, श्रीलंका किंवा युएई या ठिकाणांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या आयोजनानुसार बांगलादेशातील महिला टी-२० वर्ल्ड कप सामने ढाका आणि सिल्हेत येथे आयोजित केले जाणार आहेत. स्पर्धेचा पहिला सामना २ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल तर अंतिम सामना २० ऑक्टोबर रोजी ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल.

Exit mobile version