विरोधकांच्या धमक्यांना मी घाबरत नाही!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठणकावलं

विरोधकांच्या धमक्यांना मी घाबरत नाही!

शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. राहुल नार्वेकर हे जाणून बुजून यावर सुनावणी घेण्यास तसेच निकाल देण्यास वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार केला जात आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या रद्द झालेल्या दौऱ्याबाबत एक ट्वीट केलेलं त्यासंदर्भातही राहुल नार्वेकरांनी उत्तर दिलं आहे.आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय कायद्याच्या चौकटीतच राहून घेतला जाईल. आपल्या निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न कोणीही करु नये, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलताना म्हणाले की, “अनेक माध्यमातून, अनेक लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण यापूर्वीही सांगितलं आहे की, मी माझा निर्णय संविधानातील तरतूदींच्या आधारावर घेणार आहे. कोणीही कितीही मला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचे आरोप केले, तरीही मी त्यातून कोणत्याही प्रकारे प्रभावित होणार नाही. नियमानुसारच मी काम करणार.” त्यांच्या गिधड धमक्यांना अध्यक्ष घाबरत नसल्याचे राहुल नार्वेकर म्हणाले.

हे ही वाचा:

चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी लवकरच हवाई दल आणखी सुसज्ज

‘डीन’ला स्वच्छतागृह साफ करायला लावण्याप्रकरणी खासदार हेमंत पाटलांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

इटलीमध्ये पर्यटकांची बस उलटून २१ ठार

आपचे खासदार संजय सिंग यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे

आदित्य ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांच्या रद्द झालेल्या परदेश दौऱ्याबाबत ट्वीट केलं होतं. त्यासंदर्भातही आज राहुल म्हणाले की, “माझा परदेश दौरा मी २६ सप्टेंबरलाच रद्द केलेला. माझ्या काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी त्या कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहू शकणार नाही, असं २६ तारखेलाच CPA ला कळवलं होतं. पण २८ तारखेला उगाच त्या दौऱ्याबाबत मोठी चर्चा घडवून, त्यातून आपण हा दौरा रद्द करायला लावल्याचा केविलवाणा प्रकार काही नेत्यांनी केला. पण त्यांचा हा प्रयत्न आहे की, कसंही करुन अध्यक्षांवर दबाव आणायचा. पण अध्यक्ष त्यांच्या या गिधड धमक्यांना घाबरत नाही. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव होत नाही, त्यामुळे नियमांनुसारच कामं होणार.”

“माझ्या मतदारसंघात मी इतर काही लोकांसारखा आपला मतदारसंघ विधान परिषदेतल्या आमदारांकडून चालवत नाही. मी माझ्या मतदारसंघात स्वतः उतरुन काम करतो. आजही दिवसातले चार तास माझ्या मतदारसंघातील कार्यालयात बसून मी माझ्या विभागातील लोकांचे प्रश्न सोडवतो. त्यामुळे ज्यांना विधानसभा मतदारसंघ इतर लोकप्रतिनिधींमार्फत चालवण्याची सवय आहे. त्यांना हे समजणारच नाही की, लोकांमध्ये जाऊन कसे प्रश्न सोडवायचे? त्यामुळे यावर भाष्य करण्याची गरज नाही.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावणार आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर आवश्यक त्याप्रमाणे नोटीस पाठवायच्या आहेत त्यांना देऊ. मूळ राजकीय पक्ष कोणता यावरही निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे ज्यांना नोटीस बजावणं आवश्यक आहे त्यांना नोटीस बजावणार, असं त्यांनी सांगितलं.

 

 

Exit mobile version