रशिया-युक्रेन युद्धात हैदराबादच्या तरुणाचा मृत्यू!

रशियन सैन्यात मदतनीस म्हणून होता कार्यरत

रशिया-युक्रेन युद्धात हैदराबादच्या तरुणाचा मृत्यू!

नोकरीच्या फसवणुकीला बळी पडून रशियन सैन्यात भरती होण्यास भाग पाडण्यात आलेल्या हैदराबाद येथील एका ३० वर्षीय व्यक्तीचा युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.मोहम्मद अस्फान असे या तरुणाचे नाव असून तरुणाला रशियातून परत आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयाने एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे मदत मागितली होती.तथापि, एआयएमआयएमने मॉस्कोमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असता तेथील अधिकाऱ्यांनी मोहम्मद अस्फानचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.

मोहम्मद अस्फानचा पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.अस्फानची सुद्धा इतर तरुणांप्रमाणे फसवणूक झाली होती.युद्धात रशियन सैन्याला मदत करण्यासाठी अस्फानला एजंटकडून ‘मदतनीस’ म्हणून नियुक्त केले गेले होते.

दरम्यान, युक्रेनबरोबर चालू असलेल्या युद्धात रशियन सैन्यात ‘मदतनीस’ म्हणून काम करणाऱ्या गुजरातमधील २३ वर्षीय भारतीय व्यक्तीचा रशियामध्ये मृत्यू झाल्याची नुकतीच घटना घडली होती.हेमिल मंगुकिया (वय २३ वर्षे) असे या तरुणाचे नाव असून तो सुरतमधील पाटीदार वराछा येथील आनंदनगर वाडीचा रहिवासी होता.

हे ही वाचा :

पंतप्रधानांची दक्षिण मोहीम; भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता

हा कसला राजा हा तर भिकारी!

मलाही मुसेवाला-नफेसिंगप्रमाणे मारतील!

ममता बॅनर्जींना संदेशखालीतील घटनेचा काहीही फरक पडत नाही!

हेमिल मंगुकियाने ऑनलाइन जाहिरातीद्वारे रशियामध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता आणि तो चेन्नईहून मॉस्कोला पोहोचला होता. त्यानंतर तो रशियन सैन्यात सहाय्यक म्हणून भरती झाला.त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी रशिया-युक्रेन सीमेवरील डोनेस्तक भागात युक्रेनने केलेल्या हवाई हल्ल्यात हेमिल मंगुकिया ठार झाला होता.रशियन सैन्यात मदतनीस म्हणून काम करण्यासाठी अनेक भारतीयांना फसवले गेले आहे.तसेच काहींना सीमावर्ती भागात युक्रेनियन सैनिकांशी लढण्यासदेखील भाग पाडले जात असल्याचे मीडियाच्या माध्यमातून दिसून आले.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले होते की, अजूनही २० लोक रशियामध्ये अडकल्याची आमच्याकडे माहिती आहे.त्यांच्या सुटकेसाठी आम्ही आमच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.तसेच युद्धाच्या परिस्थितीत भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आणि भारतीयांना संघर्ष क्षेत्रापासून दूर राहण्याचा सल्ला, परराष्ट्र मंत्रालयाने दिला.यांच्या सुटकेसाठी आम्ही आम्ही रशियन अधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले होते.

Exit mobile version