उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभ मेळ्याचा समारोप बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. महाकुंभ मेळ्याला जगभरातून करोडो भाविकांनी उपस्थिती लावली. भाविकांच्या आकड्याने ६६ कोटींहून अधिकची संख्या गाठली. अनेक विक्रम या संख्येने रचले. पण, जवळपास महिनाभर चाललेल्या या महाकुंभ मेळ्यात भाविकांच्या संख्येची गणना कोणी आणि कशी केली गेली हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावत आहे.
महाकुंभ मेळ्यात तब्बल ६६ कोटींहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात स्नान केले. पण, आलेल्या भाविकांची संख्या सरकारने कशी मोजली हा प्रश्न आहे. अंदाजाने आकडे देऊन अतिशयोक्ती तर केलेली नाही ना? असा प्रश्न विचारला जात असतानाचं विरोधकांकडूनही काही प्रश्न उपस्थित केले जात होते. पण, या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने लोकांची गणना करण्यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरली आहे.
महाकुंभाच्या आयोजनावेळी एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज असे ५०० कॅमेरे परिसरात बसवण्यात आले होते. आता तिथे आलेल्या भाविकांची गणना ही तीन प्रकारे केली जाते. पहिला प्रकार म्हणजे गर्दीच्या घनतेचा अंदाज घेऊन लोकांची गणना केली जाते. कोणत्या क्षेत्रात एका वेळी किती लोक आहेत यावरून ही आकडेवारी येते. दुसरा प्रकार म्हणजे दृश्यमान लोकांची गणना करणे. म्हणजे जत्रेच्या परिसरात वरून लोकांची डोकी जी दृश्यमान आहेत ती मोजणे. तिसरा प्रकार म्हणजे चेहरा ओळखीने (Facial Recognition) मोजणी करणे. यात एआय कॅमेऱ्याच्या मदतीने चेहऱ्याची ओळख करून डेटा तयार केला जातो आणि हे सुनिश्चित केले जाते की, येणाऱ्या लोकांची मोजणी केली जात आहे. शिवाय एका व्यक्तीला दोन वेळा मोजले जाऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते.
तरीही एखादी व्यक्ती महाकुंभ मेळा परिसरात दुसऱ्यांदा आला असेल तर त्याची गणना पुन्हा केली जाते. म्हणजेचं जे भाविक महाकुंभमेळ्याच्या परिसरात एकापेक्षा जास्त दिवस आले असतील त्यांची गणती एकापेक्षा जास्त वेळा केली गेली आहे. मात्र, असे लोक असले तरी त्यांची संख्या एक टक्क्याहून कमी असेल. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवर फारसा फरक पडणार नाही.
हे ही वाचा :
अॅड. साळवी यांच्या ‘कॉमेंट्री ऑन पॉक्सो’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपीवर एक लाखांचे बक्षीस जाहीर!
महाकुंभ- एकतेचा महायज्ञ संपन्न झाला; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना
हमासकडून युद्धबंदी कराराअंतर्गत चार ओलिसांचे मृतदेह सुपूर्द
सध्या जगभरातील गर्दी मोजण्यासाठी एआय प्रणालीचीचं मदत घेतली जाते. यातून केलेल्या मोजणीच्या यशाचा दर हा जगात सर्वाधिक असून तो ९० टक्के ते ९९ टक्के आहे. यशाची ही आकडेवारी फार मोठी आहे. २०२१ मध्ये टोकियो येथे पार पडलेली ऑलिम्पिक स्पर्धा, २०२२ मध्ये कतारमध्ये आयोजित फिफा विश्वचषक स्पर्धा, गेल्या वर्षी झालेली हज यात्रा या सर्व गर्दीच्या ठिकाणी जमलेली माणसे मोजण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता.