पुण्यात पावसाचा हाहाःकार; शहरासह जिल्ह्यात पूरस्थिती

खडकवासला धरण १०० टक्के भरले असून धरणातून ४० हजार क्यूसेक वेगाने विसर्ग

पुण्यात पावसाचा हाहाःकार; शहरासह जिल्ह्यात पूरस्थिती

पुणे शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अशातच हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय खडकवासला धरण १०० टक्के भरले असून धरणातून ४० हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होणार आहे.

पुणे शहरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचले असून पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पूलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. सध्या प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सकाळी सहा वाजल्यापासून ३५,५७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात १०० मिलिमीटर आणि घाटमाथ्यावर २०० मिलिमीटरपेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. भिडे पूल, गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितळा देवी मंदिर डेक्कन, संगम पूल पुलासमोरील वस्ती, जयंतराव टिळक पूल आणि होळकर पूल परिसर या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून कळवण्यात आले आहे.

लोणावळ्यातही पावसाने यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद केली आहे. गेल्या चोवीस तासांत तब्बल ३७० मिलिमीटर पाऊस बरसला आहे. म्हणजे १४.५७ इंच इतका पाऊस कोसळला आहे. या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे बोलले जाते आहे. १ जूनपासून २९७१ मिलीमीटर इतका पाऊस बरसला आहे.

हे ही वाचा:

मुसळधार पावसामुळे मुंबईतील तलावांसह धरणात ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता मविआच्या प्रचारासाठी सज्ज

राज्यात रेल्वेसाठी तब्बल १५ हजार ९४० कोटींची तरतूद

ॲमेझॉनवरून मागवला एअर फ्रायर, मिळाला ‘सरडा’ !

पुण्यात तीन जणांचा शॉक लागून मृत्यू

पुण्यात तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथील ही घटना आहे. अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना शॉक लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला. हे तिघे जण अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. रात्री गाडी बंद करून पाऊस जोरात आला म्हणून तिथे आवराआवरी करायला परत गेले होते. तिथे गुडघाभर पाणी साचलं होते.

Exit mobile version