हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात पावसाचा प्रकोप; विविध घटनांमध्ये १६ लोकांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात पावसाचा प्रकोप; विविध घटनांमध्ये १६ लोकांचा मृत्यू

उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाने चांगलाच जोर पकडला असून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. विशेष करून दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ढगफुटीसदृश पावसाने कहर केला आहे. या दरम्यान झालेल्या विविध घटनांमध्ये १६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुसळधार पावसामुळे घडलेल्या विविध घटनांदरम्यान उत्तराखंडमध्ये १२, तर हिमाचल प्रदेशात चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, ५० नागरिक बेपत्ता झाले आहेत. हिमाचल प्रदेशात अनेक घरे, इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आहेत. शिवाय अनेक रस्ते, पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.

कुलूमधील निर्मंड, सैंज आणि मलाना तर मंडीमधील पधर आणि शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे ढगफुटी झाली. मनाली- चंदीगड महामार्गावर झालेल्या भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. भूस्खलन आणि बियास नदीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे मनाली- चंदीगड राष्ट्रीय महामार्गाचा संपर्क खंडित झाला आहे. तर मुसळधार पावसामुळे सफरचंदाच्या बागांचेही प्रचंड नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे, उत्तराखंडमध्येही पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. पूरस्थितीमुळे एकाच कुटुंबातील तीन जणांसह १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत. येथेही मुसळधार पावसात अनेक घरांची पडझड झाली असून पुरामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे.

हरिद्वार जिल्ह्यात सहा, टिहरी येथे तीन, देहरादूनमध्ये दोन तर चमोलीत एका नागरिकाचा मृत्यू झाला. नैनिताल जिल्ह्यात एक सात वर्षांचा मुलगा नदीच्या प्रवाहात वाहून गेला. दरम्यान, पूरग्रस्त भागात एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

वायनाडमधील आपत्तीग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेला धावून!

बीजेडीच्या खासदाराचा काल राजीनामा, आज भाजपात प्रवेश !

गांधी-वाड्रा परीवाराच्या धर्म-जातीबाबत लपवाछपवी का?

पूजा खेडकरला धक्का, कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

दरम्यान, पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून गौरीकुंड-केदारनाथ महामार्गावरून केदारनाथला जाणाऱ्या जवळपास ४५० यात्रेकरूंना रोखण्यात आले आहे. भीमबली येथे दरड कोसळल्यामुळे केदारनाथ मार्गावर अडकलेल्या २०० यात्रेकरूंना सध्या सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आल्याची माहिती आपत्ती सचिव विनोद कुमार सुमन यांनी दिली आहे.

Exit mobile version