मुंबईसह कोकणपट्ट्यात धुवांधार 

रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत, महाड-भोर वरंधा घाट ३१ ऑगस्ट पर्यंत बंद

मुंबईसह कोकणपट्ट्यात धुवांधार 

मुंबईसह उपनगरात आणि परिसरातील जिल्ह्यात पहाटेपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई जिल्ह्यातही पावसामुळे नदी, नाले, बंधारे भरुन वाहत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात पावसामुळे धबधबे ओसंडून वाहत आहे. त्यामुळे, पर्यटकांनीही या धबधब्याच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. रायगड जिल्ह्यातील महाड-भोर वरंधा घाट ३१ ऑगस्ट पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने लागू केले आहेत.

ठाणे जिल्ह्यात सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग होती. रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यावरुन वाहन चालवताना वाहन चालकांची कसरत होत असून सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवली,उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर परिसरात एक तासाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. कल्याण डोंबिवलीत काहीशी विश्रांती घेतलेल्यानंतर एक तासापासून पुन्हा पावसाने हजेरी लावली.

रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून सकाळपासून सर्वत्रच धुवांधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्जिकल वार्डमध्ये पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. अलिबागच्या मुख्य रस्त्यावरही अशीच परिस्थिती दिसून आली, येथील अनेक रस्ते पाण्यात बुडाल्याने वाहनचालकांची तारांबळ उडल्याचे पाहायला मिळत आहे .

सिंधुदुर्गात उद्या हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, उद्या जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही पावसाची संततधार सुरूच आहे. दापोलीतील पोलीस लाईन समोर छोटे व्यापारी गाळे असलेल्या एका कटलरी व्यावसायिकाच्या दुकान खोक्यावर झाडाची भली मोठी फांदी कोसळली. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून खोकेमालक चंद्रकांत मुलुख आणि पादचारी बालंबाल बचावले. दरम्यान, दापोलीतही सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येतंय.

हे ही वाचा:

“काँग्रेसने सेकंड प्रेफरन्सची मतं समान न वाटता ठाकरे गटाला प्राधान्य दिल्याने निकाल बदलला”

उबाठाचा ‘अजगर’ लहान पक्षांना गिळतोय !

संभाजीनगरमध्ये ‘इसिस’चे जाळे; ५० हून अधिक विद्यार्थी ‘व्हॉट्सऍप ग्रुप’ मॉडेलमध्ये अडकले

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर थांबवून अज्ञातांकडून दगडफेक

मुसळधार पावसाचा गुवगर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेला तडाखा बसला आहे. येथील बाजारपेठ सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. गुहागर-चिपळूण महामार्गाला नदीचे स्वरूप आल्याने वाहन चालकांचीही कसरत झाल्याच दिसून आलं. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version