दुसर्‍या बाळंतपणासाठी सरकार महिलांना देणार ६ हजार रुपये!

सुधारित योजनेनुसार ही रक्कम २ टप्प्यांत दिली जाणार

दुसर्‍या बाळंतपणासाठी सरकार महिलांना देणार ६ हजार रुपये!

महाराष्ट्र शासनाने ‘मिशन शक्ती’च्या अंतर्गत राज्यात ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना २.०’ लागू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील महिलांना बाळंतपणासाठी सरकारकडून ६ हजार रुपये इतके आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. यापूर्वी या योजनेच्या अंतर्गत पहिल्या बाळंतपणाच्या वेळी सरकारकडून ५ हजार रुपये दिले जात होते. सुधारित योजनेच्या अंतर्गत दुसर्‍या बाळंतपणासाठीही शासनाकडून आर्थिक साहाय्य केले जाणार आहे.

यापूर्वीच्या योजनेच्या अंतर्गत पहिल्या बाळंतपणासाठी देण्यात येणारे ५ हजार रुपये ३ टप्प्यांत दिले जात होते. सुधारित योजनेनुसार ही रक्कम २ टप्प्यांत दिली जाणार आहे, तसेच दुसर्‍या बाळंतपणासाठी दिले जाणारे अर्थसाहाय्य एकरकमी दिले जाणार आहे. यासाठी केंद्रशासनाकडून ६० टक्के, तर ४० टक्के रक्कम राज्यशासनाकडून दिली जाते. गरीबीमुळे गरोदरपणात महिलांना मजूरीसाठी जावे लागते. त्यामुळे माता आणि अर्भक यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे माता आणि बालक यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होते. हे रोखण्यासाठी शासनाकडून वर्ष २०१७ पासून मातृवंदना योजना लागू करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

इस्रायलमधून नवऱ्याशी बोलताना अचानक कॉल कट आणि….

घर चालवल्याप्रमाणे शरद पवार पक्ष चालवत होते!

ब्लॉगरचा दावा; चिनी एजंट्ने केली हरदीपसिंग निज्जरची हत्या

सॉफ्टवेअर हॅक करून लुटलेल्या २५ कोटींच्या गुन्ह्याची उकल करताना आढळला १६ हजार कोटींचा घोटाळा

योजनेची वैशिष्ट्ये
माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी.
जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा.
सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूणहत्येस अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल.
लाभार्थ्यांकडून आरोग्य संस्थांच्या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढून संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वृद्धिंगत करणे.
नवजात अर्भकाच्या जन्माबरोबरच जन्मनोंदणीचे प्रमाणात वाढ व्हावी.

Exit mobile version