उत्तर प्रदेशातले गोई हे वटवाघळांचे गाव

वटवाघळांना पळवून लावण्याचा प्रयत्न झाला पण नंतर गावाने त्यांना स्वीकारले

उत्तर प्रदेशातले गोई हे वटवाघळांचे गाव

जर ‘बॅटमन’ उत्तर प्रदेशचा रहिवासी असता, तर गोई हे गाव त्याचे नक्कीच घर असते. उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील गोई गाव हे हजारो वटवाघुळांचे घर आहे, तेही गेली ७० वर्षे. त्यामुळे बाकीची गावे कोंबड्याच्या आरवण्याने जागी होत असली तरी, तरी गोई गावातील ग्रामस्थ मात्र वटवाघळाच्या आवाजाने जागी होतात. या ग्रामस्थांचे वटवाघळांशी एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे मध्य उत्तरप्रदेशातील गोई हे गाव वटवाघळांचे अघोषित अभयारण्यच झाले आहे.

 

 

गोई येथील शैलेंद्र पांडे यांच्या विस्तीर्ण घरात आल्यावर आपल्याला वटवाघळांचे दर्शन होते. त्यांचे विशिष्ट आवाज आपले लक्ष वेधून घेतात. पांडे यांच्या आंबा आणि मंकी जॅक झाडांवर या शेजाऱ्यांनी बस्तान मांडले आहे. गोई येथे सुमारे १५०० वटवाघुळे आहेत. ‘आता आम्हाला त्यांच्या ओरडण्याची सवय झाली आहे. ही वटवाघळे माणसांना किंवा पिकांना हानी पोहोचवत नाहीत,’ असे पांडे यांनी सांगितले. ‘मोठा आवाज केल्यानंतर ही वटवाघुळे पळून जातील, या आशेने मी फटाक्यांवर खूप पैसे खर्च केले. फटाके वाजले की ते पळून जायचे, मात्र आवाज थांबताच पुन्हा ते झाडांवर परतायचे. अखेर ते कुठे जाणार नाहीत, ते येथेच राहतील, ही परिस्थिती मी स्वीकारली,’ असे ते सांगतात.

 

 

विशेष म्हणजे ही वटवाघुळं त्याच झाडांवर परत आली, ती त्यांच्या उत्कृष्ट दिशादर्शक क्षमतेमुळेच. वटवाघुळं हे सस्तन प्राणी असून ते रात्री अन्नाची शिकार करतात. ते प्रतिध्वनी वापरून, तसेच पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी आणि सूर्यास्ताच्या प्रकाशाशी संरेखित करून त्यांचा मार्ग शोधतात. काही दशकांपूर्वी वटवाघळांनी गोईमध्ये महुआ आणि अन्य एका झाडाला आपले वसतिस्थान बनवले होते, परंतु ती झाडे नष्ट झाली आणि त्यांनी त्यांचा मोर्चा पांडे यांच्या अंगणातील आंब्याच्या झाडांकडे वळवला.

हे ही वाचा:

गिल खेळला, पण पराभव झाला!

सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल, सेंड अँड्र्यूज कॉलेजला जेतेपद

आदित्य एल-१ने चौथ्यांदा यशस्वीपणे बदलली कक्षा

चंद्रावर पाणी असल्याला पृथ्वीचे वातावरण जबाबदार

काही गावकऱ्यांनी वटवाघळांपासून सुटका करण्यासाठी ही झाडे तोडण्याचा सल्ला दिला… पण त्यांनी नवीन झाडे निवडली असती. त्यामुळे त्यांनी तो सल्ला धुडकावला. आता येथील गावकरी त्यांच्या या कायमस्वरूपी पाहुण्यांसोबत राहायला शिकले आहेत. मी वटवाघळांसह मोठा झालो आहे… आता मला त्यांची भीती वाटत नाही,’ असे महाविद्यालयीन विद्यार्थी कलीम अहमद सांगतो. ‘ग्रामपंचायतीने तोडगा काढण्यासाठी अनेक बैठका घेतल्या, पण त्यांना यश मिळाले नाही,’ असे कलीमने सांगितले.

 

 

काही गावकऱ्यांचा समज आहे की, ही वटवाघळे त्यांना ‘वाईट चिन्हां’पासून वाचवतात. करोना साथीच्या काळात वटवाघळांमुळे हा आजार पसरण्याची भीती होती. पण त्यांची भीती निराधार असल्याची जाणीव गावकऱ्यांना झाली.
वटवाघळांची भीती वाटत असूनही गोईच्या रहिवाशांनी आतापर्यंत त्यांच्याविरोधात वन विभागाकडे तक्रार केलेली नाही, असे प्रतापगढ जिल्हा वन अधिकारी जे. पी. श्रीवास्तव सांगतात. तर, वटवाघळाचे फायदेही असल्याचे काही तज्ज्ञ लक्ष वेधतात. वटवाघळे ही उत्कृष्ट कीटक नियंत्रक आणि वनस्पतींच्या परागकणाचे वाहकही आहेत, असे पर्यावरणवादी अजय क्रांतिकारी यांनी सांगितले.

Exit mobile version