घाटकोपरमध्ये दगडफेक, मुफ्तीच्या द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी पाच जण ताब्यात!

परिसरात तणावाचे वातावरण

घाटकोपरमध्ये दगडफेक, मुफ्तीच्या द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी पाच जण ताब्यात!

गुजरातमधील जुनागढ येथे द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी मौलाना मुफ्ती सलमान अझारी यांना पोलिसांनी रविवारी अटक केली होती.मुफ्ती सलमान अझारी यांना अटक केल्यानंतर आता पोलिसांनी घाटकोपर येथून आणखी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.या पाच जणांना अटक करून घेऊन जात असताना जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.या दगडफेकीत चार ते पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून घाटकोपरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका सभेत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी मौलाना मुफ्ती सलमान अझारी याला रविवारी पोलिसांनी अटक करून घाटकोपर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.या प्रकरणी आणखी पाच जणांना घाटकोपर येथून पोलिसांनी अटक केली.घाटकोपर पश्चिमेतून सलमान सईद, अजीम शेख आणि मोहम्मद शब्बीरलाल मोहम्मद यांना तर विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातून मोहम्मद बिलाल अब्दुल रहमान काझी आणि अब्दुल रहमान अब्दुल्ला काझी यांना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात चार आरोपी २१ ते ३२ वयाचे असून एक आरोपी ६० वर्षांचा आहे.

या पाच आरोपींना पोलीस घेऊन जात असताना पोलिसांना जमावाचा सामना करावा लागला.जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.या हल्ल्यात चार ते पाच पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे.तसेच जमावाने बेस्टच्या बसेसवरही दगडफेक केली आहे. त्यामुळे भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

चंपई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठरवा जिंकला

आम्ही सरकारसाठी काम करतो कुटुंबासाठी नाही

राहुल गांधींची यात्रा देशाचे नुकसान करण्यासाठी!

पाकिस्तानात पोलीस ठाण्यावर हल्ला, १० पोलीस ठार तर ६ जखमी!

दरम्यान, ३१ जानेवारी रोजी गुजरातच्या जुनागढ येथील एका मैदानात एक कार्यक्रम पार पडला होता. त्या कार्यक्रमाला मौलाना मुफ्ती सलमान अझारी यांनी संबोधित केले होते.त्यावेळी मौलाना मुफ्ती सलमान अझारी यांनी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले होते.या धर्मोपदेशकाने केलेल्या द्वेषपूर्ण भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली.या प्रकरणी गुजरातमधील जुनागढ पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली.

गुजरात एटीएसने मुफ्ती मौलानाला घाटकोपर पोलिस ठाण्यात आणले, तेव्हा घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर शेकडो लोक जमा झाले होते. जमावाला पांगवण्यासाठी मुंबई पोलिसांना लाठीमार करावा लागला.मुंबई पोलिसांकडून जमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आयपीसी कलम ३५३ , ३३२, ३३३, ३४१, ३३६, ३३७, ३३८, १४१, १४३, १४५, १४७, १४९ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत जमावाविरुद्ध मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version