संतांवर जातीय टीका करणाऱ्या मानव यांची जादूटोणा कायदा समितीतून हकालपट्टी करा

हिंदु जनजागृती समितीची शासनाकडे मागणी

संतांवर जातीय टीका करणाऱ्या मानव यांची जादूटोणा कायदा समितीतून हकालपट्टी करा

तत्कालीन काँग्रेस शासनाने जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे (PIMC) सहअध्यक्ष श्याम मानव हे आजही त्या समितीवर कार्यरत आहेत. खरे तर मानव यांनी खोटे लिखाण केले, म्हणून त्यांना न्यायालयाने शिक्षा आणि आर्थिक दंड ठोठावला होता. तसेच ते सातत्याने वारकरी संप्रदायातील साधूसंतांवर जातीयवादी भाषेत टीका करून धार्मिक भावना दुखावण्याचे काम करत असतात. त्यामुळे या शासकीय समितीतून श्याम मानव यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे येथील सुप्रसिद्ध डॉ.प.वि. वर्तक यांच्याविषयी खोटे लिखाण प्रसिद्ध केल्याविषयी पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. पाध्ये यांच्या न्यायालयाने प्रा. श्याम मानव यांना एक दिवसाची कैद आणि आर्थिक दंड ठोठावला होता. ‘मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम १९५०’च्या कलम ५६ अन्वये फौजदारी गुन्हा सिद्ध झालेल्या व्यक्तीला कोणत्याही सार्वजनिक समिती वा न्यासावर सदस्य म्हणून राहता येत नाही. तसे असल्यास ते पद आपोआप रहित होते. त्यामुळे शासनाने कायद्याच्या समितीत मानव यांना घेणे बेकायदेशीर आहे.

हेही वाचा..

जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा

चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये येशूची थट्टा; टीकेची झोड, भारतात ठरले असते अभिव्यक्ती स्वातंत्र्य

हिंदु धर्म, संत परंपरा यांविषयी द्वेष बाळगणारे मानव यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित जादूटोणा कायद्याच्या जनजागृती कार्यक्रमात ‘ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले, हे धादांत खोटे सांगितले जात आहे’, अशा प्रकारची अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. यापूर्वीही ‘कुलकर्ण्यांचं १२ वर्षांचं पोरं (संत ज्ञानेश्वर महाराज) भिंत काय चालवणार?’, ‘संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले नसून त्यांचा खून झाला आहे’, अशा प्रकारची वारकर्‍यांसह महाराष्ट्राच्या धार्मिक भावना दुखावणारी अनेक आक्षेपार्ह आणि जातीयवादी विधाने करत असतात. हा नेमका कोणत्या जादूटोणा कायद्याचा प्रचार आहे? हा कायद्याचा प्रचार नसून वारकर्‍यांच्या जाणीवपूर्वक श्रद्धाभंजनाचा अघोरी प्रकार आहे.

सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून हिंदु संतांची बदनामी करणार्‍या श्याम मानव यांची तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे.
अशाच प्रकारचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करून समाजसेवकाचे मुखवटा घातलेल्या ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने त्यांच्या ट्रस्टमध्ये अनेक आर्थिक घोटाळे केले आहेत. त्याच्या रितसर तक्रारी झालेल्या आहेत. ‘अंनिस’ने तर शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचे अंशदान बुडवले आहे. विदेशांतून लाखो रुपये घेऊन त्याचा हिशेब न दिल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने अंनिसची FCRA (विदेशी मुद्रा) नोंदणी रहित केली आहे. ‘अंनिस’च्या ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची शिफारस साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी केली आहे. या सर्व प्रकारांची शासकीय स्तरावर सखोल चौकशी चालू आहे.

या संघटनेच्या कार्यकर्त्यांना नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याप्रकरणी अटका देखील झाल्या आहेत. अशा भ्रष्ट, घोटाळेबाज, अर्बन नक्षली संघटनांना आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांना शासकीय समित्यांमध्ये स्थान मिळणे, अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे श्याम मानव यांच्याप्रमाणे या संघटनेतील पदाधिकार्‍यांनाही शासकीय समितीतून तात्काळ बाहेर काढावे व ती समिती बरखास्त करावी, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी आहे.

Exit mobile version