विधानसभेसाठी निवडणुक यंत्रणा सज्ज!

मतदानाचा टक्का वाढवावा, मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

विधानसभेसाठी निवडणुक यंत्रणा सज्ज!

भारत निवडणूक आयोगाने दिनांक १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी येथे केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकच्या कार्यक्रमा संदर्भात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.

अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकता. निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच १९ ऑक्टोबर पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी केले.

निवडणूक कार्यक्रमाची रुपरेषा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ ची अधिसूचना मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी राजपत्रात निर्गमित करण्यात येईल. तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी पर्यंत आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार ३० ऑक्टोबर रोजी करण्यात येईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवार ४ नोव्हेंबर रोजी पर्यंत आहे. बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून शनिवार २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात येईल. सोमवार २५ नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. त्याचप्रमाणे राज्यातील लोकसभेच्या १६ – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती चोक्कलिंगम यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा : 

अवैध दारू प्यायल्याने आठ जणांचा मृत्यू!

विजेचा शॉक, नखे काढली, अन गोळ्यांनी छातीची चाळण केली!

भारतात प्रवेश करताना चार बांगलादेशींना अटक!

हा बघा काँग्रेस नेत्याचा प्रताप !

एकूण ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदार

राज्यात १५ ऑक्टोबरपर्यंत पुरुष मतदारांची संख्या ४ कोटी ९७ लाख ४० हजार ३०२ इतकी असून महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख २३ हजार ७७ इतकी तर तृतीय पंथी मतदारांची संख्या ६ हजार ३१ इतकी आहे. आतापर्यंत एकूण ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. सन २०१९ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ९२५ इतके होते. यामध्ये वाढ होण्याच्यादृष्टीने महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात आल्याने २०२४ मध्ये या प्रमाणात ९३६ अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

सध्याच्या मतदार यादीत १८-१९ वर्षे वयोगटामधील नव मतदारांची संख्या २० लाख ९३ हजार २०६ एवढी आहे. याशिवाय १ लाख १६ हजार ३५५ इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अद्ययावत मतदार यादीमध्ये ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १२ लाख ४३ हजार १९२ इतकी आहे. यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मतदार यादीतील ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांपैकी ४७ हजार ७१६ इतके मतदार १०० वर्षावरील आहेत.

Exit mobile version