इर्शाळवाडीमधील अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व एकनाथ शिंदे स्वीकारणार

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून मुलांची जबाबदारी घेणार

इर्शाळवाडीमधील अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व एकनाथ शिंदे स्वीकारणार

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटननेनंतर दुर्घटनाग्रस्त मुलांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला पुढे धावून आले आहेत. या मुलांचे पालकत्व एकनाथ शिंदे स्वीकारणार आहेत. अनाथ झालेल्या या मुलांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे या शनिवार, २२ जुलै रोजी सकाळी इर्शाळवाडी येथे पोहचल्या होत्या. त्यांनी या मुलांचे पालकत्व स्वीकारण्याची माहिती दिली.

नीलम गोऱ्हे यांनी इर्शाळवाडीत जाऊन दुर्घटनास्थळाची पाहणी केली. त्यांच्यासोबत मनिषा कायंदे आणि शीतल म्हात्रे या नेत्या देखील उपस्थित होत्या. या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण निर्वासित झाले आहेत. दुर्घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशन इर्शाळवाडीतील मुलांची जबाबदारी घेणार आहे. मुलांचे पूर्ण शिक्षण होईपर्यंत फाऊंडेशन सहकार्य करेल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या माध्यमातून येथील नागरिकांना पक्की घरे बांधून देण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

विराट कोहलीची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी

महिला सुरक्षेबाबत स्वत:च्याच सरकारवर प्रश्नचिन्ह; राजस्थानच्या मंत्र्याची हकालपट्टी

इर्शाळवाडी दुर्घटना: मृतांची संख्या २२ वर, शोधकार्य सुरू

देशातील सर्वात श्रीमंत आमदार कर्नाटकातील काँग्रेस नेते शिवकुमार

“अनेक मुलांनी आपले आई- वडील गमावले आहेत. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे. हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

Exit mobile version