‘तीनमूर्ती’ची इकोफ्रेंडली गणेशमूर्ती

‘तीनमूर्ती’ची इकोफ्रेंडली गणेशमूर्ती

श्रावणापासून सण-उत्सवाची लगबग सुरू होते, आपसूकच चाहूल लागते ती आपल्या लाडक्या बाप्पाची. रस्त्यावर बाप्पाचे मंडप उभारले जातात, गणेशभक्तांची लगबग सुरू होते. श्रावणसरींचा आनंद घेत, केव्हा एकदा हा श्रावण सरतोय आणि भाद्रपद उजाडतोय असे वाटायला लागतेे. गणेशभक्त वाट पाहत आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताला आतुर झालेले असतात. अशीच एक लगबग सुरू आहे ती मागठाणे येथील मागठाणे तीनमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची.

इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे वारे या मंडपात वाहताना दिसतात. गेली कित्येक वर्षे हे मंडळ साडेतीन फूटाच्या शाडूच्या मूर्तीची मंडपात प्रतिष्ठापना करत आहे, हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.

सन १९७८ एका चार मजली इमारतीत सुरू झालेल्या या गणेशोत्सवाचे हे यंदाचे ४७ वे वर्ष. इमारतीच्या पुर्नर्विकासामुळे ८० कुटुंबाचा हा गणेशोत्सव आज २२४ कुटुंबाचा झाला आहे. मागठाणे वसाहतीत हा बाप्पा विराजमान झाला १९७८ साली. त्यावेळी मागठाणे वसाहतीत सतरा इमारती होत्या. इमारती सतरा आणि सार्वजनिक गणपती एकही नाही. हे मनाला पटणारे नव्हते. त्यावेळेस इमारत क्र. १७ मधील काही तरुण मंडळींनी पुढाकार घेतला. आपल्या इमारतीपुरता तरी एक सार्वजनिक बाप्पा आपण आणावा. पण बोलणे सोपे असते आणि कृती कठीण हे आपण जाणताच. खूप विचारविनीमय करून ज्येष्ठांशी बोलण्याचे धाडस तरुण मंडळींनी केले. ज्येष्ठांचा होकार मिळताच त्यांचा आशीर्वाद घेऊन एक छोटेखानी दीड फूटाची मूर्ती इमारत क्रमांक १७त मोठ्या दिमाखात विराजमान झाली.

नवीन मंडळ म्हटल्यावर अडचणी येणारच. पण रहिवाशांच्या मदतीने त्यावर मात करण्यात आली. रहिवाशांनी मंडळाला अनेक वस्तूंची मदत केली, सहकार्य केले. बाप्पाची मूर्ती मीच देणार असा विविध ठिकाणी आग्रह असतो. पण इथे पुढच्या वर्षीची मूर्ती कोण देणार हे आजच ठरलेले आहे. मंडळाची वर्गणी ही एका इमारतीपुरती मर्यादित असते. मात्र इमारत सोडून इतरत्र वास्तव्यास गेलेल्या रहिवाशांचा वर्गणी आणि मंडळाच्या विविध कामात आर्थिक सहभाग असतो. हे रहिवाशी गणेशोत्सव काळात श्रींच्या दर्शनाचा अवश्य लाभ घेतात.

आता इमारत नंबर १७ चे स्वरूप मोठे झाले आहे. चार मजली इमारतीचे आता टोलेजंग २३ मजली टॉवरमध्ये रुपांतर झाले आहे. कुटुंबं मोठं झालंय. कुटुंबांची संख्या २२४ वर पोहोचली आहे. या टॉवरचे काम सुरू असताना विकासाच्या ऑफिसमध्ये छोटेखानी चार वर्षे गणपती बाप्पा विराजमान होते.

मंडळाची आज चौथी पिढी बाप्पाची सेवा करत आहे. मंडळाचे स्वरूप मोठे झाले असले तरी जुनं तेच सोनं याचं भान ठेवून परंपरेने ४७ व्या वर्षी ठरल्याप्रमाणे आपली परंपरा व संस्कृती हे मंडळ जपत आहे. हिरिरीने काम करतेय. बाप्पाची मूर्ती साडेतीन फूटी झाली आहे. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्ती कायम त्याच स्वरूपाची असते. तिचा साचा ठरलेला आहे. देवीपाडा येथील कीर्ती आर्ट्सचे श्री. शिवलकर यांच्याकडे बाप्पा आकार घेतो. इमारतीमधील रहिवाशांनी स्वेच्छेने मूर्तीसाठी चांदीचे आभुषण बनवलेले आहेत. मुकुटापासून पायाच्या आसनापर्यंत दागिने बाप्पाला भेट दिलेले आहेत. हेच दागिने दरवर्षी बाप्पाला परिधान केले जातात.

आरतीसाठी प्रॅक्टीस घेतली जाते. ठराविक आरत्या म्हटल्या जातात. मंडपातील सर्व उपस्थितांना आरतीचा मान मिळतो. ओळखीचा असो वा नसो प्रत्येकाला मान दिला जातो. आरती बरोबर नऊच्या ठोक्याला सुरू होते. त्यामध्ये गेली ४७ वर्षे काडीमात्र बदल झालेला नाही. जी शिस्त पहिल्या वर्षापासून सुरू आहे ती नित्यनियमाने आजही पाळली जाते. गणपतीला नेवैद्य, प्रसाद बिल्डिंगमधील रहिवाशांमार्फत येतो. सोसायटीतील मुलांच्या कलेला वाव मिळण्यासाठी त्यांच्यासाठी चित्रकला, वक्तृत्व आणि इतर स्पर्धात्मक स्पर्धा घेतल्या जातात. स्पर्धेचे आय़ोजन महिला करतात. पूर्व नियोजन या महिलांच्या हाती असते. गृहनिर्माण संस्थेची सत्यनारायणाची पूजा ही गणेशोत्सवच होते.

वैचारिक मतभेद टाळण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा या मंडपात रोवला जात नाही. बॅनर लावले जात नाहीत. पूर्वापार वर्षापासून सुरू असलेली परंपरा आजही इथे जपली जात आहे. कस्तुरबा मार्ग पोलिस स्टेशनच्या पुरस्काराने मंडळाला गौरविले आहे.

सात दिवसाची मनोभावे पूजा केल्यानंतर दिवस उजाडतो तो विसर्जनाचा. गणपती विसर्जनाला कोकणातील परंपरेनुसार गाऱ्हाणे घातले जाते. ही परंपरा अजूनही सुरू आहे. इमारतीतील विविध कुटुंबे याचा लाभ घेतात. जवळ-जवळ दीड ते दोन तास यासाठी लागतात. बाप्पाची विसर्जन मिरवणूक हे मंडळाचे आकर्षण आहे. ट्रक खऱ्या फुलांनी सजवलेला जातो, हे या विसर्जन मिरवणूकीचे आकर्षण असते. पुण्यातील पुणेरी ढोल पथकाला गेली कित्येक वर्षे हे मंडळ आमंत्रित करत आहे. त्यांच्याच ठेक्यावर या मंडळाची विसर्जन मिरवणूक ताल धरते. तो सोहळा अतिशय शिस्तबद्ध असतो, वसाहतीतील मंडळी विसर्जन मिरवणूकीची आवर्जून तासन् तास वाट पाहत असतात. वसाहतीत विसर्जन मिरवणूकीस तीन तास लागतात. विसर्जन मिरवणूकीत गुलाल उडवला जात नाही. प्रत्येकाचा ड्रेसकोर्ड पारंपारिक ड्रेस पांढरा सलवार-कुर्ता आणि भगव्या कलरचा फेटा. नॅशनल पार्कात तलावात मूर्ती विसर्जनासाठी गेल्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने तीन वेळा मूर्तीला विसर्जित केली जाते. पूर्णपणे बाप्पाचे विसर्जन होत नाही तोपर्यंत कार्यकर्ते हटत नाहीत. कार्यकर्त्यांचे हेच प्रेम व आपुलकीकायम राहो हिच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना.

कार्यकारी मंडळ
सुलभा माने-अध्यक्षा
अमर सूर्यवंशी-उपाध्यक्ष
हार्दिक केणी-सचिव
गौरव पाटकर-सहसचिव
गणेश अहिरे-खजिनदार
जयेश पाटील-सहखजिनदार

Exit mobile version