विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (२७ जून) सुरु होणार आहे. तत्पूर्वी, आज चहापानाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विरोधकांच्या पत्राला प्रत्युत्तर दिल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर आरोप केले. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सर्वाधिक पेपरफुटी झाल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्या पासून अधिवेशनाची सुरवात होणार असून मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार अधिवेशनात सामोरे जाणार आहे. प्रथेप्रमाणे आजही विरोधी पक्षाने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसेच त्यांनी दिलेलं जे पत्र आहे ते म्हणजे, ‘खोटे बोल पण रेटून बोल’, खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीमध्ये थोडी मते मिळाल्यानंतर आता इथून पुढे खोटेच बोलायचे आहे अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष गेला आहे असे मला वाटते.
ते पुढे म्हणाले, त्यांनी दिलेलं पत्र म्हणजे स्वतःचा चेहरा आरशात पाहण्यासारखे आहे. महाविकास आघाडीने सांगितले की, विदर्भातील सिंचन प्रकल्पाला अपयश आले. जे अडीच वर्ष सत्तेमध्ये होते तेच हे बोलत आहेत. त्यावेळी यांच्याकाळात एकही प्रकल्प मार्गी लागला नाही. आपण ८७ प्रकल्प पूर्ण करत आहोत. त्यांची एकही फाईल मुंगीच्या चालीएवढी पुढे हललेली नाही आणि हे आम्हाला प्रश्न विचारत आहेत. या पत्रात उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची सही आहे, तर त्यांनी स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांच्याकाळात विदर्भातील एकाही प्रकल्पाला का मान्यता मिळाली नाही?, असा सवाल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
हे ही वाचा:
प्रज्वल रेवण्णाला कोर्टाकडून आणखी एक झटका, जामीन अर्ज फेटाळला!
काँग्रेसने स्वहस्ते केले तोंड काळे…
महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून; ‘हे’ मुद्दे गाजण्याची शक्यता
‘ओवेसीची जीभ छाटा अन पारितोषिक घेवून जा’
पेपर फुटीच्या संदर्भात ते बोलत आहेत. परंतु, सर्वात जास्त पेपर फुटीची प्रकरणे कोणाच्या काळात झाली आहेत तर ती उद्धव ठाकरेंच्या काळात झाली आहेत. गुंतवणूक दारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरविली असे ते म्हणत आहेत. मात्र, त्यांच्याकाळात तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वामध्ये दोन्ही वर्षी नंबर एकवर आलेला आहे. विरोधकांनी उघडलेल्या खोटे नरेटिव्ह तयार करण्याच्या या फॅक्टरीचा आम्ही अधिवेशनात पर्दाफाश करू, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. बॉडीबॅग घोटाळा, खिचडी घोटाळे याचीही उत्तरे विरोधी पक्षाने द्यावी. तसेच मीडियासमोर बोलण्यापेक्षा आमच्यासमोर या आम्ही त्याची उत्तरे देण्यास तयार असल्याचे फडणवीस म्हणाले.