मुसळधार पावसामुळे मुंबईतील तलावांसह धरणात ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा

मुंबईतील १० टक्के पाणीकपात लवकरच रद्द होण्याची शक्यता

मुसळधार पावसामुळे मुंबईतील तलावांसह धरणात ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा

राज्यासह मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून राज्यातील नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत. अशातच मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. मुंबई आणि पुण्याला वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होत असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईसह पुण्यातील अनेक धरणात ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबई शहरासह उपनगराला सात पाणी साठ्यातून पाणी पुरवठा केला जातो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात पाणी साठा क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील तालावांसह धरणात निम्म्याहून अधिक म्हणजे जवळपास ५३.१२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यासोबतच तुळशी तलावही काठोकाठ भरला आहे. तसेच सर्वात मोठे भातसा धरण ५२ टक्के भरल्याची माहिती आहे. मुंबईतील सातही जलाशयांमध्ये निम्म्याहून अधिक (५३.१२ टक्के) पाणीसाठा जमा झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. हा पाणीसाठा मुंबई, ठाणे, भिवंडी आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पुढील साधारण १९२ दिवस म्हणजेच २ मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका आहे.

मुसळधार पावसाने मुंबईकरांची पाणी चिंता काही प्रमाणात मिटवल्यामुळे सध्या मुंबईत सुरू असलेली पाणी कपात रद्द होण्याची शक्यता आहे. मुंबईतील १० टक्के पाणीकपात लवकरच रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील पाणीकपात रद्द करण्याबाबत आयुक्तांकडे जल विभागाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत मुंबईतील पाणीकपात रद्द करण्याबद्दलचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा:

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता मविआच्या प्रचारासाठी सज्ज

राज्यात रेल्वेसाठी तब्बल १५ हजार ९४० कोटींची तरतूद

ॲमेझॉनवरून मागवला एअर फ्रायर, मिळाला ‘सरडा’ !

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओव्हर फ्लो!

पुण्यातील दमदार पावसामुळे खडकवासला १०० टक्के भरले

मुंबईसह पुण्यातही मुसळधार पाऊस असून गुरुवारी सर्व शाळांना सुट्टी देण्यात आले आहे. पुण्यातील खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. तर पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे ७० टक्के भरली आहेत. सध्या खडकवासला धरणातून ३५ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा प्रवाह सुरु आहे. तर इतर चार धरणात जवळपास २०.२७ टीएमसी पाणीसाठा आहे.

Exit mobile version